भाजपला आगीशी न खेळण्याचा इशारा
कोलकता : नागरिकत्व दुरूस्ती कायदा (का) रद्द होईपर्यंत शांततामय मार्गाने निदर्शने चालूच राहतील, अशी परखड भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरूवारी मांडली. त्यांनी भाजपला आगीशी न खेळण्याचा इशाराही देतानाच विद्यार्थ्यांनी कोणालाही न घाबरता निदर्शने सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
काविरोधात ममता स्वत: रस्त्यावर उतरत आहेत. मागील 11 दिवसांत त्यांनी त्या वादग्रस्त कायद्याचा निषेध करण्यासाठी 5 व्या रॅलीत सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपवर टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या, कोणीही घाबरण्याची गरज नाही. मी भाजपाला इशारा देते की त्यांनी आगीशी खेळू नये. जामिया मिलिया, आयआयटी कानपूर, आणि का विरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी मला सहानुभूती आहे.
काविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना भाजपकडून धमकावले जात आहे. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठिशी आहोत. त्यांनी कुणालाही न घाबरता निदर्शने चालूच ठेवावीत. तृणमूल कॉंग्रेस पक्ष सर्व समाजांसाठी लढा देईल. कुठल्याही पक्षाला आम्ही अधिकार हिरावू देणार नाही. काविरोधी आंदोलन वाचवण्यासाठी प्रसंगी आम्ही आमच्या प्राणांचे बलिदान देऊ, अशा आक्रमक शैलीत ममतांनी भूमिका मांडली. मोदी सरकारने घुसखोर शोधण्याऐवजी जनतेला अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध करावा. जनतेला रोजगार पुरवावेत, असेही त्यांनी म्हटले.
भारतीय जनता पक्षाचे नेते दिलेली आश्वासने पाळत नाहीत. कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी मंगळुरूत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना दिलेली मदत रद्द केली. याकडे त्यांनी लक्ष वेधले.