दिल्ली : अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संघ प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. ओवेसी म्हणाले,घटनेत स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताचा कोणताही धर्म नाही. भारताचा प्रत्येक धर्मावर विश्वास आहे. कोणत्याही धर्मावर विश्वास नसलेल्यांचा देखील भारत आदर करतो.
आरएसएस नेहमी संविधानाविरूद्ध बोलत असतो. राज्यघटनेत समानतेचा अधिकार का आहे? राज्यघटनेत जगण्याचा अधिकार का आहे? राज्यघटनेमध्ये कलम 26, कलम 29,कलम 30 का आहे? कारण भारत प्रत्येक भारतीयांच्या अस्मितेचा आदर करतो. हीच भारताची खरी ओळख असल्याचे ते म्हणाले.
ओवेसी म्हणाले की, आम्ही पूर्वोत्तर राज्यांना विशेष संरक्षण का देतो? ईशान्येकडे जाऊन मोहन भागवत हे विधान करु शकतात का? राज्यघटनेची प्रस्तावना स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि न्यायाबद्दल सांगते. भारताची हिच खरी ओळख असून तिचा सर्व भारतीय आदर करतात.
लष्करप्रमुखांच्याही निवेदनावर ओवेसीचा पलटवार
लष्करप्रमुखांवर केलेल्या ट्विटबाबत ओवेसी त्यानी प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, राज्यघटनेत असे म्हंटले आहे कि सेना नागरी प्रश्नामध्ये हस्तक्षेप करणार नाही. लष्करप्रमुखानी नागरी प्रकरणात हस्तक्षेप करू नये असे आवाहन देखील त्यानी केले.