पुणे – शहर आणि जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरून झालेल्या नुकसानीसाठी प्रत्येकी 5 हजार रुपये शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार ही मदत आता शहरी भागात प्रत्येकी 15 हजार आणि ग्रामीण भागात प्रत्येकी 10 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य शासनाकडे 5 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले, अनेकांची घरे, संपूर्ण संसार पाण्यात गेला. याचा पुणे शहरातील तब्बल 9 हजार 315, पिंपरी-चिंचवड येथील 4 हजार 880, हवेलीमध्ये 2 हजार 363 नागरिकांना फटका बसला. तर ग्रामीण भागात बारामती 771, भोर 21, दौंड 984, इंदापूर 219, मावळ 14, मुळशी 124, पुरंदर 282, शिरुर 131 अशा एकूण 19 हजार 220 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.