रंधवे कुटुंब उघड्यावर : न्याय देण्याची मागणी
आळंदी (वार्ताहर) – आळंदी देवाची येथील भूखंड क्रमांक एक, दोन, तीन यातील जमीन संपादनाचा मोबदला व मोकळी जागा परत मिळावी, यासाठी भूखंडधारक सिद्धार्थ नारायण रंधवे व संदीप काशिनाथ रंधवे परिवार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना अद्याप न्याय मिळाला नाही.
रंधवे यांनी दि. 8 फेब्रुवारी 2019 या तारखेस महार वतनाच्या असणाऱ्या जमिनीबाबत आळंदी मंडलाधिकारी कार्यालय तसेच खेड तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाचा विचार करून तहसीलदारांनी दि. 10 जून 2019 रोजी आळंदी देवाची मंडलाधिकारी कार्यालयात सर्व कागदपत्र पुराव्यानिशी घेऊन जबाबकामी हजर राहण्यासाठी शासनाच्या वतीने पत्र दिले होते. या भूखंडधारकांनी मिळालेल्या पत्रास अधीन राहून उपस्थिती दाखवली होती.
त्या ठिकाणी रंधवे परिवाराकडे असलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. आमच्या गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी विनंती करण्यात आली. शासनदरबारी यांचे म्हणणे ऐकून घेतले. पुढील निर्णय तुम्हाला लवकरच कळविण्यात येईल, असे पोकळ आश्वासन याठिकाणी देण्यात आल्याचे रंधवे यांनी सांगितले. त्यानंतर रंधवे परिवाराने दि. 1 डिसेंबर 2019 रोजी पुन्हा विनंती अर्ज दाखल केला. या अर्जात आम्हाला आमच्या जमीन संपादनाचा मोबदला व मोकळ्या जागा परत मिळाव्यात, आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. नगरपालिकेने आमच्या मोकळ्या जागांवर आरक्षणे टाकून एसटी बसस्थानक उभे केले. स्मशानभूमी उभी केली. ग्रामीण रुग्णालय बांधले. आळंदीमध्ये ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. त्या ठिकाणी पालिकेने जागा भाड्याने देऊन पैसे कमावण्याचा धंदा सुरू केला. तरीदेखील आमची कोणीच दखल घेतली नाही, असे रंधवे परिवाराकडून सांगण्यात आले. नगरपालिकेने आम्हाला आमच्या जागा परत द्याव्यात किंवा त्याचा परतावा भाडेस्वरूपात मिळावा, असा अर्ज रंधवे परिवाराने पुन्हा शासनाकडे केला आहे.
भूखंडासंदर्भात येत्या दोन दिवसांत रंधवे परिवारास बोलवण्यात येणार असून पूर्ण चौकशीअंती निर्णय देण्यात येईल.
– चेतन चासकर, मंडलाधिकारी, आळंदी.