वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीने वेळापत्रक कोलमडले
महावितरणच्या निष्क्रिय कारभाराचा लघुउद्योजकांना फटका
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देशात औद्योगिक शहर म्हणून आहे. शहरात अनेक लहान मोठे उद्योग वसले आहेत. परंतु, शहरातील उद्योजकांना मागील काही दिवसांपासून महावितरणच्या निष्क्रिय कारभाराचा फटका सहन करावा लागत आहे. एमआयडीसी परिसरासह नागरी वसाहतीमध्येही दररोज दोन ते अडीच तास विद्युतपुरवठा खंडित होत असल्यामुळे शहरातील नागरिकांसह उघुउद्योजकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे, एमआयडीसीसह शहरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी उद्योजक व नागरिकांतून होत आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून दररोज विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. कोणतेही कारण नसताना शहरातील विविध रहिवासी भागांमध्ये विजेचा लपंडाव नित्याचाच सुरू आहे. तसेच एमआयडीसी भागातही काही ठिकाणी दररोज दोन ते अडीच तास वीजपुरवठा खंडित होत आहे. सातत्याने वीजगुल होत असल्यामुळे उघुउद्योजक मेताकुटीस आले आहेत. एमआयडीसीमधील टी, एस ब्लॉक आणि ए या परिसरात वीजपुरवठा करणारी यंत्रणा जुनी झाल्यामुळे त्यात सातत्याने बिघाड होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, या भागामध्ये दररोज दोन ते अडीच तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुुळे या भागातील कारखान्यामधील उत्पादन निर्मितीचे काम ठप्प होत आहे.
त्याचा परिणाम उत्पादनावर होत असल्याने अगोदरच आर्थिक मंदीला तोंड देत असलेल्या उघुउद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान औद्योगीक भागाला होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी अनेकदा करूनही महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे, महावितरणच्या निष्क्रिय कारभाराबद्दल उद्योजक व नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
औद्योगिक वसाहती बरोबरच नागरी वसाहतीमध्येही विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणच्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांमुळे विजेचे वेळापत्रकच कोलमडले आहे. महावितरणच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून शहरात सातत्याने विस्कळीत होत असलेला वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
एकाच ठिकाणी बसलेल्या कर्मचाऱ्यांची कामात दिरंगाई
महावितरणच्या पिंपरी आणि भोसरी विभागात अनेक ठिकाणी गेली अनेक वर्षे तेच कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांची कामातील दिरंगाईमुळे महावितरणचे वेळापत्रक बिघडले आहे. या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कारभार सुधारण्याची मागणी परिसरातून होत आहे. शासकीय नियमांची पायमल्ली करून वरिष्ठांकडे सेटिंग लावत हे कर्मचारी वर्षानुवर्षे या ठिकाणी ठाण मांडून आहेत. या कर्मचाऱ्यांविरोधात अनेक तक्रारी असूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नाही. काही कर्मचाऱ्यांनी तर आपल्या हाताखाली खासगी माणसे ठेवली आहेत आणि लाईट कट करणे, वीज जोडण्या देणे, अनेक बेकायदा कामे करणे असे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. अशा सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून नवीन कर्मचारी नेमावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येऊ लागली आहे.
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकारीही अनभिज्ञ
शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. रविवारी आकुर्डी परिसरात तब्बल सात तास वीजपुरवठा खंडित झाला होता. तर शनिवारीही अशीच परिस्थिती होती. पिंपरी, भोसरी परिसरातही सातत्याने अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित होत आहे. विद्युतपुरवठा नेमका कोणत्या कारणामुळे खंडीत होत आहे याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही अनेकदा नसते. त्यामुळे, सध्या महावितरणमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराबद्दल नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.