अभिनेत्री रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्विटला रिप्लाय
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारावर देशातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून केले होते. त्यांच्या याच ट्विटला आता अभिनेत्री रेणुका शहाणे हिने खोचकपणे रिप्लाय केला आहे. भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गॅंग आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणुका यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सोमवारी देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. देशातील या अशांततेसाठी भाजपाचे आयटी सेल जबाबदार असल्याचा टीका रेणुका शहाणे यांनी ट्विटवरुन केली आहे.
Sir, please ask people to stay away from all your IT cell Twitter handles then. They spread the most amount of rumours, falsehoods and are totally against brotherhood, peace and unity. The real.”tukde tukde” gang is your IT cell sir. Please stop them from spreading hate ???? https://t.co/bMaXDFnvsP
— Renuka Shahane (@renukash) December 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर बोलताना हे सर्व दुर्दैवी आणि त्रासदायक असल्याची प्रतिक्रिया सोमवारी ट्विटवरुन दिली. मोदी यांनी एकमागोमाग एक ट्विट करत सध्या सुरु असलेल्या हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या याच ट्विटला कोट करुन रेणुका शहाणे यांनी मोदींना तसेच भाजपाच्या आयटी सेलला सणसणीत टोला लगावला आहे.
सर (तुम्हाला देशात शांतता हवी असेल तर) तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हॅण्डलपासून सामान्यांना लांब राहण्यास सांगा. या हॅण्डलवरुनच सर्वाधिक अफवा, खोटी माहिती पसरवली जाते. ही माहिती देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला मारक आहे. सर तुमचे आयटी सेल हीच खरी तुकडे तुकडे गॅंग आहे. कृपया त्यांना द्वेष पसरवण्यापासून थांबवा,असं ट्विट रेणुका यांनी केलं आहे.
रेणुका यांचे हे ट्विट व्हायरल झाले असून आठ हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केले आहे. रेणुका यांनी थेटपणे सरकारी धोरणांवर टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशाप्रकारे अनेक घटनांवरुन सरकारला खडेबोल सुनावले आहेत. दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणावरुन इंटरनेटवर दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये आंदोलकांवरील कारवाईचे समर्थन करणारा एक गट आणि दुसरा गट हा विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध करणारा गट आहे.