नवी दिल्ली : महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणा-या निर्भया फंड, वनस्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण 195 कोटी 54 लाख 30 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने “निर्भया फंड’ तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासीत प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरीत करण्यात आला आहे. महाराष्ट्राला “निर्भया फंड’ अंतर्गत एकूण 149 कोटी 40 लाख 6 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला 31 कोटी 5 लाखांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ मदत पोचविण्यासाठी देशभर “वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात आले आहेत, महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी 14 कोटी 46 लाख 54 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. तसेच अडचणीत सापडलेल्या महिलांना तत्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या “महिला हेल्पलाईनचे’ सार्वत्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला 62 लाख 70 हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.