मुंबई – पाणी हा आपल्या जीवनाशी निगडित असलेला सर्वात मोठा घटक आहे. जर तुम्हाला दूषित पाणी मिळतं असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पाणी शुद्ध असल्याचा दावा करण्यात आला होता.
दरम्यान, नुकतंच मुंबईतील पाण्यात एक वेगळाच व्हायरस/ विषाणू आढळून आला आहे. या विषाणूंची वाढ इतर विषाणूंच्या तुलनेत खूप वेगवान होत असून, या विषाणूंपासून मानवी आरोग्यास धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी विषाणूंना ‘वांद्रे मेगाव्हायरस’ आणि ‘कुर्ला व्हायरस’ अशी नावे दिली आहेत.
यापूर्वी देखील अश्या प्रकारचे विषाणू इंग्लंडमध्ये आढळून आले होते. इंग्लडच्या कुलिंग टॉवरवर सन १९९२ मध्ये हा विषाणू सापडला होता. यानंतर या प्रकारच्या विषाणूंचा शोध जगभरातील मोठा शहरांमध्ये घेण्यास सुरुवात झाली. देशात जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने निधी उपलब्ध करून आयआयटी मुंबईतील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल पाच वर्ष शोधकार्य केलं. आणि त्यांना यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले होते.
संशोधनादरम्यान विविध शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची चाचणी केली गेली. त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत. पवई लेक व्हायरस, मिमी व्हायरस बॉम्बे, वांद्रा व्हायरस, कुर्ला व्हायरस अशी ही नावं आहेत.