बडोदा : सलामीवीर केदार देवधरच्या नाबाद दीडशतकी खेळीच्या जोरावर बडोद्याच्या संघाने दुस-या दिवसअखेर ९ बाद ३०१ अशी मजल मारली आहे. मुंबईच्या शम्स मुलानी याने ५ गडी बाद करत बडोद्याचा निम्मा संघ गारद केला. बडोदा संघ मुंबईपेक्षा अद्याप १३० धावांनी पिछाडीवर आहे.
Stumps Day 2: Baroda – 301/9 in 68.6 overs (S I Sopariya 1 off 8, Kedar Devdhar 154 off 184) #BDAvMUM @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
मुबंईचा पहिला डाव आज दुस-या दिवशी पहिल्या सत्रात ४३१ धावांवार संपुष्टात आला. मुंबईकडून पहिल्या डावात फलंदाजीत शाम्स मुलानीने ८९, अंजिक्य रहाणेने ७९, पृथ्वी शाॅने ६६ आणि शार्दुल ठाकूरने ६४ धावा काढल्या. बडोदा संघाकडून गोलंदाजीत भार्गव भट आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. अभिमन्यूसिंगने २ गडी बाद केले.
मुंबईच्या ४३१ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना बडोद्याची सुरूवात खराब झाली. शार्दुल ठाकूरने आदित्य वाघमोडेला २ धावांवर रहाणेकरवी झेलबाद करत बडोद्याला पहिला धक्का दिला. त्यानंतर केदार देवधर आणि विष्णू सोळंकी यांनी डाव सावरत दुस-या विकेटसाठी १०५ धावांची भागिदारी रचली. मुलानीने सोळंकीला ४८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर केदार देवधरने दीडशतकी खेळी करत एक बाजू संभाळून धरली, पण इतर फलंदाज अपयशी ठरल्याने बडोद्याचा डाव गडगडला.
दुस-या दिवसअखेर बडोद्याची ९ बाद ३०१ अशी अवस्था झाली असून दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सलामीवीर केदार देवधर १८४ चेंडूत १५४ तर सोयेब सोपारिया १ धावेवर खेळत होता. मुंबई संघाकडून पहिल्या डावात गोलंदाजीत शम्स मुलानीने २७ षटकात ९९ धावा देत ५ गडी बाद केले. शंशाक अत्तार्डेने २ तर शार्दुल ठाकूर आणि तूषार देशपांडेने प्रत्येकी १ गडी बाद केला.