पुणे – जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर अपयशाला मात देत यश मिळवता येते. याचाच प्रत्यय दामिनी देशमुख यांनी दिला आहे. हवाई दलातील प्रवेश परीक्षेत राष्ट्रीय नामांकन मिळविलेल्या दामिनी या लवकरच हैद्राबाद येथील एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत. तब्बल दोन वेळा या परीक्षेत मेडिकल ग्राऊंडवर अपयशी ठरलेल्या दामिनी या तिसऱ्या प्रयत्नात परीक्षेत यश मिळवत, आपल्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत आहेत.
पुण्याचे धर्मदाय सहआयुक्त दीपक देशमुख यांची कन्या असलेल्या दामिनीने आपले शालेय शिक्षण पुण्यातील राणी लक्ष्मीबाई मिलिटरी स्कूल येथून घेतले आहे, तर ऑल इंडिया शिवाजी मेमोरिअल सोसायटीतून अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पदवी घेतली आहे. हवाई दलात प्रवेश घेण्याच्या प्रबळ इच्छेनेच दामिनी यांनी या परीक्षेसाठी तयारी सुरू केली. त्या टाटा मोटर्स येथे कामदेखील करत होत्या.
हवाई दलाच्या प्रवेशासाठी केलेल्या तयारीबाबत दामिनी म्हणाल्या,”या प्रवेशासाठी प्रत्येक सहा महिन्यांनी लेखी परीक्षा घेतली जाते. यासाठी देशभरातून तब्बल 2 हजार जणांची निवड केली जाते. यानंतर एसएसबी मुलाखत घेतली जाते. केवळ 250 मुले ही मुलाखत उत्तीर्ण होऊ शकतात. यापैकी केवळ 60 ते 80 उमेदवार वैद्यकीय चाचणीसाठी निवडले जातात आणि या चाचणीतून केवळ काही जणांची प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड होते. ही निवड झालेले उमेदवार राष्ट्रीय नामांकनासाठी पात्र ठरतात आणि त्यांना हवाई दलाच्या अकादमीत प्रवेश मिळतो.’
माझ्यासाठी ही निवडप्रक्रिया संयमाची परीक्षा पाहणारी ठरली. काम आणि परीक्षेची तयारी एकाच वेळी करताना मोठी कसरत करावी लागत असे. मात्र, ती करूनही दोन वेळा मेडिकल ग्राऊंडवर निवडीस अपात्र ठरल्यावर नक्कीच वाईट वाटले. माझ्यातील या दोषांबाबत मला काहीच कल्पना नव्हती. अभ्यासात कमी पडल्यास तो अधिक अभ्यासाने पूर्ण करता येऊ शकतो, पण वैद्यकीय कमरतेचे काय करणार? त्यासाठी पूर्ण उपचार घेऊन पुन्हा प्रवेशासाठी प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. आता खऱ्या अर्थाने हवाई दलाचे प्रशिक्षण सुरू होणार असून, आनंद आणि कुतुहल अशा दोन्ही भावना मनात दाटून येत आहेत
– दामिनी देशमुख, हवाई दल प्रशिक्षणार्थी.