नगर – जिल्ह्यातील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पाच जागांच्या निवडणुकीसाठी आज गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत जिल्हा परिषद प्रवर्गातून एक,नगरपालिका प्रवर्गातून सहा,तर महानगरपालिका प्रवर्गातून 18 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषद प्रवर्गातून धनराज शिवाजीराजे गाडे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.
जिल्हा नियोजन समिती निवडणुकीसाठी पाच जागा आहेत.यात जिल्हा परिषद एक,नगरपालिका एक व महानगरपालिकेच्या तीन जागा आहेत. जिल्हा परिषदेसाठी काल धनराज गाडे यांनी एकमेव अर्ज नेला व दाखल केला होता. आज शेवटच्या दिवशी कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे.त्यांचे वडील शिवाजीराजे गाडे यांचे निधन झाल्यामुळे या जागेची पोटनिवडणूक होत आहे.
नगरपालिकेसाठी पहिल्या दिवशी गणेश बाबासाहेब भोस यांचा (श्रीगोंदा),दुसऱ्या दिवशी सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी (राहुरी), तिसऱ्या दिवशी आसाराम गुलाब खेंडके,शहाजी तुकाराम खेतमाळीस व रमेश झुंबर आढाणे (तिघे श्रीगोंदा) असे एकूण पाच अर्ज विक्री झाले होते. आज या पाच जणांसह मंदार सुभाष पहाडे (कोपरगाव) यांनी अर्ज दाखल केल्याने नगरपालिका प्रवर्गातून अर्ज दाखल झालेल्यांची संख्या सहा इतकी झाली असून यातील चौघे जण श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातून काल अकरा जणांनी अर्ज नेले होते. आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या मागास प्रवर्गातून अविनाश हरीभाऊ घुले,विनीत नाथ पाऊलबुध्दे,सुवर्णा दत्ता जाधव व मनोज लक्ष्मण दुलम असे चार जणांनी,सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष सोपानराव लोंढे,अमोल शिवाजी येवले,सागर अर्जुन बोरूडे,सुनिल नारायण त्रिबंके,अनिल माधवराव शिंदे,मनोज शंकर कोतकर असे एकूण सहा जणांनी,तर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून मिना संजय चोपडा,ज्योती अमोल गाडे-कर्डिले,संध्या बाळासाहेब पवार,रूपाली निखील वारे,रिजवाना फारूक शेख,सुनिता शंकर कोतकर,आशा शिवाजीराव कराळे व सोनाली अजय चितळे असे आठ अर्ज म्हणजेच मनपाच्या तीन जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाले आहेत.
या तीन जागांसाठी अठरा अर्ज दाखल झाल्याने मनपा प्रवर्गात सर्वाधिक चुरस राहणार आहे. जिल्हा परिषदेसाठी 72,नगरपालिकेसाठी 229 तर,महानगरपालिकेसाठी 68 मतदार आहेत. उद्या,शुक्रवारी अर्जांची छाननी होणार असून अर्ज बाद झाल्यास त्यावर हरकत घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. 13 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल.16 डिंसेबरला अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. 24 डिसेंबरला मतदान व 26 डिसेंबरला मतमोजणी होईल.
दिग्गजांच्या अर्जाने मनपा प्रवर्गात चुरस
नियोजनसाठी मनपा प्रवर्गात तीन जागा आहे. यासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गात अविनाश घुले,विनीत पाऊलबुध्दे,सुवर्णा जाधव व मनोज दुलम यांचे अर्ज आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष लोंढे,अनिल शिंदे,मनोज कोतकर,सागर बोरूडे आदींचे अर्ज आहेत.तर महिला प्रवर्गातून माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या व शशिकांत गाडे यांची चुलतसुन ज्योती गाडे, निखील वारे यांच्या पत्नी रूपाली,बाळासाहेब पवार यांच्या पत्नी संध्या,अजय चितळे यांच्या पत्नी सोनाली,शिवाजीराव कराळे यांच्या पत्नी आशा आदींचे अर्ज आहेत. अर्ज माघारीनंतर मनपा प्रवर्गाचे खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी दिग्गजांच्या अर्जाने ही निवडणूक चुरशीने होणार हे नक्की आहे.