पक्षाच्या घटनेत केले मोठे बदल
चेन्नई : तामीळनाडूत सत्तेवर असणाऱ्या अण्णाद्रमुकने पक्षाच्या घटनेत मोठे बदल केले आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या मैत्रीण व्ही.के.शशिकला यांना पक्षाची सुत्रे हाती घेण्यापासूून रोखण्यासाठी ती खेळी करण्यात आल्याचे मानले जात आहे.
तामीळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांचे सध्या अण्णाद्रमुकवर वर्चस्व आहे. मात्र, पुढील काळात शशिकला पक्षाची सुत्रे स्वत:कडे घेण्याच्या हालचाली करू शकतात अशी चिंता बहुधा त्यांना वाटत असावी. त्यातून रविवारी झालेल्या अण्णाद्रमुक कार्यकारिणी बैठकीत पक्षाच्या घटनेत फेरबदल करण्यात आले.
त्यानुसार, अण्णाद्रमुकची कुठलीही पदे भुषवण्यासाठी किमान पाच वर्षे अखंडितपणे पक्ष सदस्य असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकवर ताबा मिळवणे शशिकला यांना अवघड बनणार आहे. बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आल्याने त्या सध्या बंगळूरमधील तुरूंगात आहेत.
शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर त्या पुन्हा सक्रिय होऊ शकतात, अशी भीती अण्णाद्रमुकच्या सध्याच्या नेतृत्वाला सतावत आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुकचे नेतृत्व शशिकला यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यानंतर पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांनी एकत्र येऊन शशिकला यांच्याकडून पक्षाची सुत्रे हिरावून घेतली.