उत्तम पिंगळे
मागच्या लेखात आपण पाहिले होते की एखादी घटना होण्यासाठी अनेक पर्याय असतात.त्यातील काही घडण्याचे प्रमाण जास्त असते तर काही कमी, काही अगदी अकल्प वा नगण्य आणि ज्यावेळी हे नगण्य प्रकार सत्यतेत येतात त्यावेळी आपण त्याला योगायोग असे म्हणतो.
24 ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल लागले आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हेमधूनही युतीचे सरकार येणार असा रोख सर्वांनी दाखवला होता.परंतु ऐन वेळी युतीतील फाटाफुटीमुळे सरकार टांगणीवर लागले होते. शेवटी याचे पर्यावसन राष्ट्रपती राजवटीमध्ये झाले. नंतरच्या परिस्थितीमध्ये अनेक जोडावा जोडणीचे पर्याय दिसत होते. सर्वात पहिला युतीचा. त्यांना लोकांनी स्पष्ट बहुमत दिले होते तो पर्याय. त्यामध्ये मग पूर्ण वेळ भाजपचा किंवा अडीच वर्षे भाजप व अडीच वर्षे शिवसेना असा पर्याय झाला असता. पण येथील घोडं पेंड खात होते. त्याचे पर्यावसन अधिकृतपणे युती तुटण्यात व शेवटी शिवसेना एनडीएमधून बाहेर जाण्यातही झाले. आता पुढील पर्यायांना वेग येऊ लागला होता. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे महाआघाडी सरकार स्थापन करणे. आता ती तशी सामान्य वा सोपी गोष्ट नव्हती. कारण शिवसेनेला झालेले मतदान हे दोन्ही कॉंग्रेस विरोधातील होते तसेच दोन्ही कॉंग्रेसला मिळालेले मतदानही युती विरोधातील होते. असे असताना केवळ मुख्यमंत्री पदासाठी अडून सेनेने अगदी विरुद्ध ध्रुवांवरील दोन्ही पक्षांशी जवळीक केली व वाटाघाटी सुरू झाल्या. मग त्यातला एक पर्याय होता की सेनेकडे पाच वर्षे मुख्यमंत्रिपद व राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्याकडे एक एक उपमुख्यमंत्रिपद.
आणखी एक पर्याय होता की राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद घेणे. कॉंग्रेसने शिवसेनेसोबत जावे किंवा नाही यासाठी त्यांच्या पक्षात दोन गट पडले होते व अजूनही आहेत. पण शेवटी महाराष्ट्राच्या राज्यासारखी सत्ता व भाजपला सत्तेपासून दूर लोटणे हे महत्त्वाचे ठरून कॉंग्रेसने पाठिंबा जाहीर केला.
एवढ्या गडबडीत सेनेतही काही आलबेल नव्हते. रोज नवनवीन वक्तव्य येत होती तसेच सेनेतही एक गट अजूनही कॉंग्रेससोबत जाण्यास नाराज होता पण मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपबरोबर वाद विकोपाला जाऊन त्या वादाने अहंकाराचे रूप धारण केले व कुणीच पड खाईना. मग नाईलाजाने सेनेतील सर्व गट सत्ता स्थापण्यास तयार झाले. अनेक समीकरणे तयार होत होती. मंत्रिपद कोणा कोणाला मिळणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे व कोण कोणती मिळणार हेही ठरवले जात होते; परंतु त्यात नीट स्पष्टता येत नव्हती. तिन्ही पक्ष ताबडतोब एकत्र बसून मार्ग काढू शकत होते पण त्यातही सामंजस्य नव्हते. असे चालू असताना अचानक अनाकलनीय शक्यता पुढे आली.
अचानक शनिवारी फडणवीस सरकार स्थापन झाले व अजितदादा यांच्या समर्थकांकडून जाहीर पाठिंबा दिला. महाविकास आघाडीचे सरकार जवळ येऊ घातले असतानाच अचानक हे सरकार स्थानापन्न झाले. म्हणजे हीसुद्धा एक शक्यता होती पण कुणीही पाहिली नव्हती किंवा ती एक नवीन शक्यता होती पण शेवटी शक्यताच होती. अंधुकशी शक्यता अचानक प्रकाशमान झाली व लोकांना शनिवारी सकाळीच समजली. सर्वांनाच एक प्रकारचा धक्का होता व राजकीय भूकंप वगैरे बातम्या सर्वच वाहिन्या सांगू लागल्या. पण पुन्हा ती अंधुकशी शक्यता प्रकाशात आल्याने सामान्यांप्रमाणे नेत्यांनाही अप्रूप वाटत आहे.