मुंबई – राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याच्यासोबत आश्चर्याची गोष्ट म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावर बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हे फारसे धक्कादायक नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या संपूर्ण राज्यातील घडामोडी बाबत वृत्त माध्यमांशी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘महाविकासआघाडीत नेते मनापासून एकत्र नव्हते. ते तत्वाने एकत्र नव्हते, शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिलेलं दिसतंय, आम्हाला सत्ता हवीय आणि भाजप नको असे म्हणत होणारी ही आघाडी फारशी टिकलीही नसती. यामध्ये शिवसेनेने ही परिस्थिती ओढवून घेतली आहे. भाजप-सेनेच्या सरकारसाठी चर्चेतून तोडगा निघाला असता. मात्र शिवसेनेला अट्टाहास नडला. असेही खडसे म्हणाले.