पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने कुणीही सत्ता स्थापन करण्यास समर्थता दाखवत नव्हता. त्यामुळे अर्जात घोडेबाजार तेजीत येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानंतर कोण माय का लाल फुटतो हे बघतोच… जो फुटेल त्याचा उदयनराजे झाल्याशिवाय राहणार नाही हे फुटणाऱ्यांनी ध्यानात ठेवावं. जो फुटेल त्याला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी पराभूत करेल, असे सूचक इशारे अजित पवार यांनी संबंधितांना दिले होते. परंतु आता खुद्द अजित पवारच भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत.
सकाळी घडलेल्या मोठ्या घडामोडीनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की , काहीही झाले तरी आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही. या वक्तव्याचा आणि अजित पवारांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांकडून चांगलाच व्हायरल केला जातोय. आणि अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना ट्रॉल करण्यात येतंय.
दरम्यान राष्ट्रवादीचा कोणताही आमदार फुटणार नाही. प्रत्येक आमदार हा शरद पवार साहेबांसोबतच आहे आणि राष्ट्रवादीसोबत आहे, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. भाजपकडे अधिकृत संख्याबळ नाहीये. ते विधिमंडळात कुठून संख्याबळ सादर करणार? आमच्याकडे संख्याबळ आहे. आम्हीच सरकार बनवणार, असं पवारांनी म्हटलं आहे.