सर्वच्या सर्व 13 तालुक्यांच्या तहसीलदारांकडे वर्ग : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
पुणे (प्रतिनिधी) –ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे सुमारे 137 कोटी रुपयांची मागणी केली होती. या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाकडे पहिल्या टप्प्यात 39 कोटी 55 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाने तातडीने 13 तालुक्यांच्या तहसिलदार यांच्याकडे वर्ग केला असून तहसिलदारांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आर्थिक मदत जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.
प्राप्त निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. निधी उपलब्ध होऊनही तो वाटपा अभावी बॅंकेतपडून राहणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर असे प्रकार घडल्यास त्याला तात्पुरता अपहार समजून संबधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जुन्नरमध्ये सर्वाधिक निधी
जुन्नर तालुक्यासाठी 9 कोटी 18 लाख रुपये, आंबेगावसाठी 5 कोटी 3 लाख, बारामती तालुक्यासाठी 5 कोटी 78 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर भोर तालुक्यासाठी 42 लाख रुपये, वेल्हा 24 लाख, मुळशी 65 लाख रुपये, मावळसाठी 1 कोटी 69 लाख रुपये, हवेलीसाठी 1 कोटी 51 लाख रुपये, खेडसाठी 1 कोटी 60 लाख, शिरूरसाठी 2 कोटी 3 लाख रुपये, पुरंदरसाठी 5 कोटी 9 लाख रुपये, इंदापूरसाठी 3 कोटी 73 लाख रुपये आणि दौंडसाठी 2 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे.