नवी दिल्ली : मोदी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने भारत बचाओ रॅलीची घोषणा केली आहे. मात्र, 30 नोव्हेंबरला होणारी ती रॅली लांबणीवर टाकण्यात आली आहे.
आता ती रॅली येथील रामलीला मैदानावरच 14 डिसेंबर या दिवशी होईल. रॅली पुढे ढकलण्यामागचे कारण पक्षाकडून देण्यात आलेले नाही. रॅलीआधी कॉंग्रेसकडून जिल्हा आणि राज्य स्तरांवर सरकारच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत.
त्या निदर्शनांच्या माध्यमातून सरकारच्या विविध धोरणांचा निषेध केला जाणार आहे. प्रामुख्याने आर्थिक मंदीचे सावट आणि बेरोजगारी या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा कॉंग्रेसचा इरादा आहे.
निदर्शनांची समाप्ती भारत बचाओ रॅलीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून सरकारशी दोन हात करण्यास कॉंग्रेस सज्ज झाल्याचे मानले जात आहे.