नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी अद्याप कॉंग्रेसला संधी दिलेली नाही, असे कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला सत्ता स्थापनेसाठी पुरेसा अवधीही दिला गेला नाही, असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
भाजपला फायदा मिळावा यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला पुरेसा अवधी दिला नाही, तर कॉंग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी पाचारणही केले नाही. कॉंग्रेसची भूमिकाही विचारात घेतली गेली नाही. घटनात्मक तरतूदींचे पालन करण्याच्या नावाखाली हे सर्व नाटक केले गेले, असेही खर्गे म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला मिळू शकतो का, असे विचारल्यावर त्यांनी राज्यपालांवर टीका केली.
शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या दाव्याबाबत आपल्याला काहीही बोलायचे नाही. ती त्यांच्या पक्षाची भूमिका असेल. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून पुढील रणनिती निश्चित करतील. येत्या 1-2 दिवसात पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असेही खर्गे म्हणाले.