उर्वरित कालावधीत स्वत:च्या मतदारसंघातील कामे करून घेण्यासाठी धावपळ
पुणे –राहिलेल्या दोन महिन्यांत स्वत:च्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी घेऊन जाण्यासाठी, तसेच आत्तापर्यंत “गाव जाहीर’ केलेली कामे सुरू करून घेण्यासाठी जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, या धावपळीमध्ये अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यामध्ये खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे विकासकामे राहिली बाजूला, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यातच कर्मचारी आणि अन्य सदस्यांचा वेळ जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सभापतींची मुदत दि.20 जानेवारी 2020 ला संपुष्टात येत आहे. दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना अडथळे आले. मात्र, सध्याच्या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, ही मुदत संपण्यास आता अवघे दोन महिने राहिले आहे. त्यामुळे मागील अडीच वर्षांत स्वत:च्या तालुक्यामध्ये नेलेल्या निधीच्या निविदा काढून विकासकामे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू आहे.
समाजकल्याण, बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, शिक्षण यासह अन्य विभागातील विकासकामे, योजना मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची गडबड सुरू झाली आहे.
मात्र, या गडबडीमध्ये पदाधिकाऱ्यांची चिडचिड होत असून, अधिकाऱ्यांबरोबरच सदस्यांमध्येही नाराजीचा सूर आहे. “पदाधिकारी स्वत:च्याच तालुक्यात निधी घेऊन जातात. आम्हाला कधी निधी मिळणार,’ अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. तर, आता अन्य अधिकाऱ्यांबरोबरही खडाजंगी होत असून, “जाऊ द्या..दोन महिने शांत बसायचे’ अशी भूमिका अधिकारी आणि कर्मचारी घेत आहेत.