आळेफाटा/अणे – जुन्नर तालुका ऊस शेती, जंगल, पाण्याने समृद्ध असल्याने येथे बिबट्याचे अनेक वर्षांपासूनचे घर आहे. मात्र, मानवाने हव्यासापोटी जंगलाची कत्तल करून बिबट्याच्या घरातच प्रवेश केला. यामुळे जंगलातील अनेक पशू-पक्षी, प्राणी इतरत्र प्रस्थापीत झाल्याने बिबट्याला आपले पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करून आपली उपजिविका भागवी लागत आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील अनेक परिसरात दररोक कोठे ना कोठे बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राण्यांचा जीव जात आहे.
दिवसा ढवळ्याही बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नगरिकांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. याचाच प्रत्यय शुक्रवारी (दि. 8) मध्यरात्रीसह शनिवारी (दि. 9) सकाळी पुन्हा आला आहे. शुक्रवारी मध्यरात्री तांबडेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी, करडू ठार तर तीन शेळ्या गंभीर जखमी तर येडगाव येथील खानेवाडी शिवारात एका वासराचा मृत्यू झाला आहे.
दररोज कोणत्या ना कोणत्या गावांत पाळीव जनावरांवर होताहेत हल्ले
तांबेवाडीत शेळी, करडू ठार; तीन शेळ्या गंभीर
अणे – तांबेवाडी (ता. जुन्नर) येथील खराडीमळ्यातील दत्तात्रय माणिक बोरचटे यांच्या गोठ्यावर शुक्रवारी (दि. 8) मध्यरात्री दीडच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एक शेळी जागीच ठार केली, तर शेळीचे एक करडू शेजारच्या उसाच्या शेतात नेऊन फस्त केले. त्याच गोठ्यात जवळ बांधलेल्या दोन शेळ्या बिबट्याने गंभीर जखमी केल्या.
बिबट्या एवढे करून शांत बसला नाही तर शेजारच्या सुरेश बोरचटे या शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून एक शेळी बिबट्याने गंभीररित्या जखमी केली. बेल्हे पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक बेल्हेकर यांनी जखमी शेळ्यांवर उपचार केले असून मृत शेळ्यांचा पंचनामा वनरक्षक दत्ता फापाळे यांनी केला आहे. तर लवकर नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी दत्तात्रय बोरचटे यांनी केली आहे.
खानेवाडी शिवारात वासराचा मृत्यू
आळेफाटा – येडगाव येथील खानेवाडी शिवारात एका शेतकऱ्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले. ही घटना शनिवारी (दि. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली.
येडगाव येथील खानेवाडी शिवारात रहाणारे शेतकरी सिताराम प्रभाकर नेहरकर यांच्या गोठ्यात गायी व वासरे बांधली होती. या गोठ्याच्या मागील बाजूस साधारणत: चार ते साडचार फूट उंचीची भिंत असून त्यावरील भाग हा मोकळा होता. या भिंतीवरुन उडी मारुन बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला व गोठ्यामध्ये बांधलेल्या पाच महिने वय असलेल्या वासरावर हल्ला करुन त्याचा जागेवरच फडशा पाडला.
या घटनेची माहिती मिळताच ओतूर वनपरीक्षेत्र विभागाचे अधिकारी देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा तसेच बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी पत्राद्वारे मागणी खानेवाडी येथील शेतकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतीने केली आहे.