लाहोर : शिख धर्माचे संस्थापक गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती निमित्त सुरू केलेल्या ऐतिहासिक कर्तारपूर कोरिडोरचे उद्घाटन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते झाले. इम्रान खान यांच्या यांनी कोरीडोरचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर हवेत फुगे सोडण्यात आले.
गेल्या वर्षीपर्यंत मला कर्तारपूर कॅरॅडोरचे महात्म्य मला माहित नव्हते. पण हा रस्ता या भागाच्या प्रगतीकडे जाणारा आहे. आमच्या पुढील पिढ्यांना शांततेत जगू देणारा आहे. आम्ही केवळ सीमाच खुल्या केल्या नाहीत तर शिख समाजासाठी आमची हृदयेही खुली केली आहेत, असे खान यावेळी म्हणाले.
या उद्घाटन सोहोळ्याचे निमित्त साधून इम्रान खान यांनी काश्मिर प्रश्नावर पुन्हा एकदा गरळ ओकली. ते म्हणाले, काश्मीरचा प्रश्न हा प्रादेशिक सीमे पलिकडचा प्रश्न आहे. तो मानवी हक्काशी संबंधित आहे. शांतता न्यायातून मिळते. त्यामुळे काश्मिरी लोकांना न्याय द्या.
दरम्यान, तत्पुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकाल तख्तचे जथ्थेदार ग्यानी हरप्रितसिंग यांच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या जथ्थ्याला झेंडा दाखवून रवाना केले. या पहिल्या जथ्थ्यात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सुखबीरसिंग बादल, नवज्योतसिंग सिध्धू यांचा समावेश आहे. शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीचे सदस्य आणि पंजाबमधील 117 लोकप्रतिनिधी या पहिल्या जथ्थ्यात आहेत.