दांगट वस्तीतील रहिवाशांची मागणी; पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांना दिले निवेदन
कराड – आगाशिवनगर, दांगटवस्ती येथील विकास लाखे याचा बुधवार, दि. 6 रोजी रात्री गोळ्या घालून निघृण खून करण्यात आला होता. शुक्रवारी विकासचा माती सावडण्याचा कार्यक्रम सकाळी पार पडला. त्यानंतर नागरिकांनी थेट पोलिस स्टेशन गाठले. विकासच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा, यासाठी लोक आक्रमक झाले होते. त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला. पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेतल्यानंतर नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना तसे निवेदन दिले.
दांगट वस्तीतील विकास लाखेला हल्लेखोरांनी पाठीमागून येत गोळ्या झाडल्या. यामागे नेमके काय कारण आहे? हल्लेखोरांचा नेमका उद्देश काय? याचा शोध पोलीस घेत असून आज अखिल महाराष्ट्रीय कोल्हाटी डोंबारी समाज व आगाशिवनगर येथील दांगटवस्ती मधील रहिवाशांनी कराड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. पोलिसांनी विकी लाखेच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करावी. या संदर्भातील निवेदन पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना उपअधीक्षक सूरज गुरव म्हणाले, विकासवर बेछूट गोळीबार करून त्याला ठार करण्यात आले. याच्या मारेकऱ्यांना शोधण्याचे काम पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केले असून यासाठी तेरा पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकातील पोलिसांना तपासाबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत.
विकास लाखेच्या जवळ असणाऱ्या नऊ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी तपास खोलवर सुरू असून येणाऱ्या दोन दिवसात निश्चितच पोलिसांना यात मोठे यश येईल. विकासच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही गुरव यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसापासून ज्या पद्धतीने मलकापूरच्या आगाशिवनगरच्या दांगट वस्तीतील नागरिकांनी सहकार्य केले तसेच सहकार्य येणाऱ्या काळातही ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.