शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा
सातारा – जिल्ह्यातील जनतेने अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांना त्रास देऊ नका. त्यांचे प्रश्न मार्गी लावा, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शुक्रवारी जनता दरबार भरवण्यात आला. जिल्ह्यातील पुनर्वसन, सिंचन, वीज, कृषी पंप, बेरोजगारी या विषयांवरील 61 अर्ज या जनता दरबाबारात आले होते. सकाळी 10 पासूनच राष्ट्रवादी भवन गजबजले होते. यात अनेकांच्या तक्रारींचे निवारण जागीच झाले. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना शिंदे यांनी सूचना केल्या. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, दीपक पवार, समिंद्रा जाधव, राजेंद्र लावंघरे, तेजस शिंदे उपस्थित होते.
अतिवृष्टी व महापुरामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची सूचना शिंदे यांनी केली. राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 42,210 शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांना विमा कंपन्यांनी तातडीने विमा रक्कम अदा करावा, अशी मागणी करण्यात आली. रब्बीची पेरणी व कर्जाची परतफेड या दोन गोष्टी शेतकऱ्यांसमोर आ वासून उभ्या आहेत. बळीराजाला सवलतीत कर्जपुरवठा करावा.
मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही अद्याप काही भागात पंचनामे सुरू झाले नाहीत. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना हेकटरी पन्नास हजार रुपये व फळबागांच्या नुकसानीसाठी हेकटरी एक लाख रुपये मदत द्यावी. रब्बीच्या पेरण्यांसाठी बी-बियाणे व खते मोफत देण्याची मागणी करण्यात आली.