नगर – राम जन्मभूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून जिल्ह्यात सर्वत्रच बंदोबस्तात वाढ केली आहे. जिल्हा पोलीस दलाने विशेष करून नगर शहरावर लक्ष केंद्रीत केले असून, नगर शहर आणि उपनगरातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविला आहे.
दरम्यान, पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. राम जन्मभूमी प्रकरणाचा निकाल कधीही येण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयाने वर्तवली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे शांततेच्या मार्गाने स्वागत करण्याचे आवाहन केले आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस आणि महसूल प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही गोपनीय सूचना दिल्या आहेत. शहरातील संवेदनशील भागांवर शहर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. भिंगार, केडगाव, मुकुंदनगर, झेंडीगेट, दरेवाडी, वाकोडी या शहरातील भागासह श्रीरामपूर, नेवासे, जामखेड तालुक्यातील संवेदनशील भागात बंदोबस्त वाढविला आहे.
शहरातील फिक्स पॉईंट लावून वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेरे योग्यस्थितीत आहेत का याचा आढावा शहर पोलिसांनी घेतला आहे. समाजविघातक व्यक्तिंची यादी तयार केली आहे. वेळप्रसंगी प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची तयारी पोलीस दलाने केली आहे.