शेतकरी हवालदिल : तोडणीला उशीर, नोव्हेंबरमधील लागवडीसाठी प्रतिकूल परिस्थिती
नाणे मावळ – मावळात यावर्षी गेल्या एका दशकातील सर्वाधिक पाऊस झाला. नोव्हेंबर महिन्याचा एका आठवडा उलटला असून अद्याप पाऊस निरोप घेण्यास तयार नाही. याचा भात शेतीवर तर विपरीत परिणाम झालाच आहे. परंतु सोबत ऊस पीकही संकटात आले आहे. पावसामुळे ऊस तोडणीला झालेला उशीर आणि नोव्हेंबरमधील लागवडीसाठी देखील प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. भात पीकापाठोपाठ ऊस शेतीही संकटात आल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
यंदा पावसाला अंदाजापेक्षा उशिरा सुरुवात झाली. आधी पाऊस येत नव्हता म्हणून शेतकरी व्याकुळ होते तर आता पाऊस जात नाही म्हणून चिंताग्रस्त झाले आहेत. जून महिन्याच्या अखेरीस खऱ्या अर्थाने सुरु झालेल्या पावसाळ्याने असा काही जोर धरला होता की, जुलै महिन्याच्या अखेरीस तालुक्यातील सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यानंतर थोड्या थोड्या दिवसांची विश्रांती घेत पाऊस बरसतच होता. परिणामी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही पहिल्यांदाच धरणे पूर्णपणे भरलेली आहेत.
पाऊस पडत असताना तो मात्र कधी कमी तर अचानक जास्त प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे नियोजन धोक्यात आले होते. हंगामाच्या सुरुवातीला भात रोपे उगवून येण्या इतपत ही पाऊस सुरू झाला नव्हता. तर अचानक जोरदार पाऊस आल्याने अनेक शेतकऱ्यांना भात लावण्यासाठी भात रोपचं जिवंतच राहिली नाही. त्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की भात रोपे भात खाचरांमध्ये पाणीच राहिले नाही. एकंदरीतच निसर्गाच्या संकटांचा सामना करत शेतकऱ्यांनी शेती पिकवली. त्याप्रमाणेच मावळातील ऊसाचे पिकही दोन-अडीच फूट पाण्यात स्वतःचे अस्तित्व धोक्यात घालून उभी राहिली होती. नोव्हेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने मावळातील ऊस भरण्यासाठी अनुकूल स्थिती असते. परंतु अजूनही पाऊस न थांबल्याने ऊसशेती संकटात सापडली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती बिघडण्याची चिन्हें निर्माण झाली आहेत. सुगीचा काळ संकटाचा होऊ लागला आहे. पावसाचा परतीचा प्रवास लांबल्याने तोडणीचा हंगाम उशिरा सुरू होणार आहे तर नोव्हेंबर महिन्यातल्या लागवडीसाठी प्रतिकूल परिस्थिती आहे. जमिनींना वाफसा नसल्याने सर्वच पिकांची पेरणीसुद्धा लांबली आहे.
पावसाळ्यात ऊस चार महिने पाण्यात
शेतकरी ऊस लागवडीनंतर पिकाची सर्व प्रकारच्या मशागतीची कामे वेळच्या वेळी करीत असतो. पाऊस सुरु होण्यापूर्वी ऊसाची बांधणी खते टाकून केली जाते. त्यानंतर ऊसाची खऱ्या अर्थाने वाढ होण्यास सुरुवात होणार असते. परंतु तोपर्यंत मावळात मुसळधार पावसाला सुरुवात होते. त्यानंतर सुमारे तीन-चार महिने शेतकऱ्यांनी जीव ओतून सांभाळलेला ऊस पाण्याखाली जातो. परिणामी ऊसाची वाढ जोमात होत नाही.
ऊसतोड हंगामास विलंब
पावसामुळे वाढ खुंटलेल्या ऊसाला मावळातील शेतकरी दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात पुन्हा नव्याने उभारी देण्याचा प्रयत्न करत असतो. उभा राहिलेला ऊस कारखान्याकडून बऱ्याचदा अनेक कारणांमुळे उशिरा तोडला जातो. परिणामी कष्टाच्या मानाने शेतकऱ्यांना एकरी कमी उत्पादन मिळते. उशिरा तोड झाल्याने पुन्हा पुढील हंगामाच्या दृष्टीने विचार करता अनेक शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी तीन-चार महिनेच मिळतात, पर्यायाने योग्य वाढ न झालेला ऊस पावसाच्या तावडीत सापडतो.
दरवर्षी पेक्षा दीड ते दोन महिन्यांनी ऊस तोडणीचा हंगाम उशिरा सुरू होणार आहे. तरीदेखील यावर्षी गेट-कॅनचा ऊस कमी असल्याने मावळ परिसरातील ऊस तोडणी दरवर्षीप्रमाणच्या वेळेत होईल.
– एस. जी. पठारे, कार्यकारी संचालक, श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखाना
अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतीचे खूपच जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे.तोडणीचा हंगाम उशिरा सुरू झाल्यास पुढील हंगामातील ऊसाची वाढ होण्यास पावसाळ्यापूर्वी कमी कालावधी मिळतो.याशिवाय सध्या नोव्हेंबर महिन्यातल्या लागवडीसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
– शिवाजीराव टाकवे, माजी संचालक श्री.संत तुकाराम सहकारी साखर कारखाना