वाहतूक विभागाचा दावा : जनजागृती, समुपदेशनाचा फायदा
पुणे – प्राणांतिक अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्टोबरमध्ये 42.30 टक्क्यांनी कमी झाले आहे, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली. जनजागृती, समुपदेशनाबरोबरच कारवाईचा वेग वाढवल्याने अपघातांची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
ऑक्टोबर 2018 मध्ये शहरात 26 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. यावर्षी 15 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात 42 टक्क्यांनी कमी झाले आहे. तर, अपघातांची संख्याही घटली आहे, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यासह नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांमुळे कोंडीचे प्रमाण जास्त आहे.
बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाची मदत घेण्यात येत असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथ, अतिक्रमणे हटवणे, हेल्मेट वापरासाठी जनजागृती आदींवर भर देण्यात येत आहे.