मुंबई – विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळाले. या सर्व पक्षांमध्ये शिवसेना-भाजपमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाली होती. आता या बंडखोरांपैकी काही जण निवडूनही आले आहेत. या बंडखोरांच्या समर्थनासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मीरा- भाईंदरच्या बंडखोर आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, गीता जैन यांनी निकाल लागल्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. बंडखोरांना युतीत स्थान दिले जाणार नाही, अस मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीआधी म्हटल होत. मात्र निकालानंतर सत्ता स्थापनेची गणित जुळवण्यासाठी आता बंडखोरांचा भाव वधारला असल्याचेही दिसत आहे.
अमरावतीमधील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनीही भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. रवी राणा यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रिती बंड यांचा पराभव केला आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांचा पराभव केला.