कॉंग्रेसचा जोरदार हल्लाबोल; कांडा यांचा पाठींबा घेण्यावरून दुटप्पी भूमिकेचा आक्षेप
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जनतेमे नाकारले आहे. तरीही पैसा आणि सत्तेचे लालूच हा पक्ष दाखवत आहे अशा पध्दतीने बनवलेले सरकार बेकायदा आहे, अशा शब्दात कॉंग्रेसने हल्ल चढवला.
हरीयाणात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली दिल्लीतून सुरू झाल्या. हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भुपिंदरसिंग हुडा दोघेही आपापल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी राजधानीत पोहोचले आहेत. दरम्यान हरियाणा लोकहित पक्षाचे नेते गोपाल कांडा यांनी अपक्षांचा पाठींबा भजपा सरकारला देऊ केला आहे.
हा पाठींबा घेण्याच्या कृतीवर टीका करताना कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला पत्रकारांना म्हणाले, गोपाल कांडा हे कॉंग्रेस सरकारमध्ये मंत्री असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची विधाने काय होती, हे तुम्हाला आठवतच असेल. आम्ही त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करायला लावले. त्यावेळी भाजपाची भूमिका काय होती आणि आता काय आहे? या दुटप्पी भूमिकेतून भाजपाची सत्तेची हाव दिसून येते. हरीयाणात सरकार स्थापन करण्यासाठी पैसा आणि सत्ता यांचे लालूच दाखवून पक्षांतर घडवण्याच्या प्रयत्नात भाजपा आहे, असा आरोप त्यांनी केला.