शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित; खरीप वाया गेल्याने रब्बीची आशा
सुपा – पारनेर तालुक्यातील जिरायती पट्टा समजल्या जाणाऱ्या सुपा परिसरात सोमवारी मध्यरात्री 2 ते मंगळवारी पहाटे 6 दरम्यान झालेल्या तुरळक ते मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सुपा परिसरातील शेती व्यवसाय हा पूर्णत: हा पावसावर अवलंबून आहे. सलग तीन वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. चालू वर्षी एका मागून एक नक्षत्र कोरडे चालले असल्याने हवामान खात्याचा अंदाज फोल ठरला. खरीप हंगाम पूर्णतःहा वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. मुगाचे पिक पूर्णपणे वाया गेल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांना पाळ्या घातल्या. पाळ्या घालून शेतकऱ्यांनी कांद्याचे बी टाकले, पाऊस आज होईल, उद्या होईल या आशेवर परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड व बी पेरणी करण्यात आली. कोरड्यात केलेली हि लागवड सुकू लागल्याने शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त होत होती.
दरम्यान, मुग पिक हातचे गेल्याने शेतकरी रब्बीतील ज्वारी पेरणीच्या तयारीला लागला. मात्र पेरणी होऊन पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतांना सोमवारी रात्री झालेल्या पावसाने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. परिसरात सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, रुईछत्रपती, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव, पळवे, जातेगाव, घाणेगाव, म्हसणे, मुंगशी, हंगा, वाघुंडे आदी गावात सोमवारी मध्यरात्री व मंगळवारी पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भोयरे गांगर्डा येथील केटीवेअर, नाले तुडुंब भरून वाहू लागले. तर शेतात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले. बाबुर्डी, रूईछत्रपती येथील हंगा नधीवरील केटीवेअर भरल्याने नदीला पाणी आले. हंगा नदीला पाणी गेल्याने रब्बीचे पिक हमखास निघेल, अशी आशा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.