पिंपरी – भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी आमदार असताना कोणाला धमकावले नाही. कधी कोणाचे वाईट केले नाही. त्यामुळेच त्यांच्या सर्वपक्षीय उमेदवारीला संपूर्ण भोसरी मतदारसंघातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ नियत विलास लांडे यांच्यामध्ये आले. त्यामुळेच इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातील जनता निवडणुकीत विलास लांडे यांनाच विजयी करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे यांनी सोमवारी (दि. 14) व्यक्त केला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि गवळीमाथा वसाहत परिसरात पदयात्रा काढली. त्यावेळी नगरसेवक वाबळे बोलत होते. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या पदयात्रेला सकाळी साडेनऊ वाजता नगरसेवक संजय वाबळे यांच्या संपर्क कार्यालयापासून सुरूवात झाली. संजय वाबळे, राष्ट्रवादीचे प्रभाग अध्यक्ष सतीश थिटे, बाळासाहेब इचके, दत्तात्रय दिवटे, अशोक थोपटे, विठ्ठल माने, अशोक आहेर, संजय उदावंत, संजय भोसले, माणिक जैद, मेरी डिसूझा, अश्विनी वाबळे, संजय सातव यांच्यासह राष्ट्रवादी, मनसे तसेच भाजप-शिवसेनेचे नाराज कार्यकर्तेही मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.
इंद्रायणीनगरमध्ये पदयात्रेला सुरुवात झाली. पुढे लांडगेनगर, गुरूविहार पांजरपोळ, जयगणेश साम्राज्य, गवळीमाथा वसाहत, गणेशनगर, बालाजीनगर, खंडेवस्ती, स्पाईन रोड, संतनगर परिसरात काढण्यात आली. डिस्ट्रिक्ट सर्कल येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय वाबळे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीत काट्याने काटा काढणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या पायाला टोचणारा काटा काढण्यासाठी विलास लांडे यांच्या अपक्ष उमेदवारीला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. विलास लांडे हे बहुजनांचे उमेदवार आहेत. त्यामुळे मतदारसंघातील अठरा पगड जाती विलास लांडे यांच्या विजयासाठी काम करत आहेत.
इंद्रायणीनगर, बालाजीनगर आणि परिसरातील औद्योगिक भागात विलास लांडे हे आमदार असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. या भागातील औद्योगिक क्षेत्रात शांतता नांदत होती. कामगार आणि कंपन्यांचे मालकांना हा परिसर सुरक्षित वाटत होता. मात्र गेल्या पाच वर्षांत या भागातील शांतता भंग झाली आहे. त्याला आळा घालण्याचे काम विलास लांडे यांच्याच माध्यमातून होणार आहे. त्यामुळे विलास लांडे यांना विजयी करून जनता मतदारसंघातील वाईट प्रवृत्तींना हद्दपार निश्चित करेल, असा विश्वासही वाबळे यांनी व्यक्त केला.