यवतमाळ – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीमुळे राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता यायला मदत झाली. भाजपा-शिवसेनेच्या यशाला कॉंग्रेस जबाबदार असल्याचे सांगत याशिवाय मंदी आणि सरकारच्या वचननाम्यावरुन राज ठाकरे यांनी टीका केली. तसेच यवतमाळची ओळख महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी झाली आहे, असेही ते म्हणाले.
यवतमाळच्या वणीमध्ये मनसे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले की, राज्याचा विरोधी पक्षनेताच शेवटी सत्ताधारी पक्षात गेला. आता हा पक्षांतराचा निर्णय त्या नेत्याने एका दिवसात घेतलेला नसेल. म्हणजे पाच वर्षांत त्या विरोधी पक्षनेत्याने कोणता कणखर विरोध सरकारला केला असेल?, असा सवाल त्यांनी केला.
गेली पाच वर्षे आणि त्याआधी सत्तेत येताना भाजप-शिवसेना युती, तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या हातून महाराष्ट्र का गेला? हे समजून घ्यायची गरज आहे. सध्या महाराष्ट्राला एका सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. अन्यथा तुमचा आवाज कोण मांडणार. सगळेच सत्तेत जाऊन बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार.
यवतमाळची सर्वाधिक आत्महत्या झालेला जिल्हा ही ओळख कशी काय होऊ शकते? असा सवाल त्यांनी केला. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना त्याचे काही वाटत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
माझी माणसं आत पाठवलीत तर तुमचा आवाज आत जाईल. सध्या राज्यात आणि केंद्रात विरोध पक्षाची भूमिकाच महत्त्वाची आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.
निवडणुकीकडे गंमत, खेळ मजा म्हणून पाहिलंत तर विषय कधीच संपणार नाही. निवडणुकीच्या वेळी पैसे फेकले तरी ही माणसं सगळं विसरुन जातात असं यांना वाटत, अशी टीकाही त्यांनी केली. रविशंकर प्रसाद यांच्या चित्रपटांनी कोटींचा धंदा केला आहे या वक्तव्यावर देखील सडकून टीका केली. चित्रपट चालले म्हणजे मंदी नाही. देशातील अनेक उद्योग बंद होत आहेत त्याला मंदी नाही म्हणायचं का?, असा सवाल त्यांनी केला.