वडोदरा: भारताच्या महिला क्रिकेट संघाने पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाला आज झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभूत करत व्हाईटवॉश दिला.
प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव 146 धावांत संपुष्टात आला. या नीचांकी धावसंख्येच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने देखील चांगलीच लढत दिली. मात्र एकता बिश्त, दिप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांच्या फिरकी गोलंदाजीच्या जाळ्यात पाहुण्या संघाच्या फलंदाजांना अडकविण्यात भारताला यश मिळाले व अवघ्या सहा धावांच्या फरकाने भारताने या सामन्यासह मालिका देखील जिंकली.
एकताने 3 तर दिप्ती व राजेश्वरी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेला यापूर्वी झालेल्या टी-20 च्या सहा सामन्यांच्या मालिकेत देखील पराभवाचा सामना करावा लागला. एकवेळ 5 बाद 55 अशी स्थिती असताना कर्णधार हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी जबाबदारीने फलंदाजी करत संघाचा डाव सावरला.
या दोघींनी संघाला किमान लढत देण्याइतकी धावसंख्या उभारली. खेळपट्टीची साथ फिरकी गोलंदाजांना मिळेल हा हरमनप्रीत कौरचा अंदाज खरा ठरला. दक्षिण आफ्रिका संघाला भारताच्या फिरकी गोलंदाजांनी महत्त्वाच्या क्षणी बळी मिळविले आणि संघाला एक अविश्वसनीय विजय मिळवून दिला.