कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागातील शेतकऱ्यांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा, यासाठी विरोधी पक्षाचा आमदार असतांनाही बंद पडलेली उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु केली, मात्र मागील पाच वर्षात या योजनेकडे आमदारांनी डोळेझाक केल्यामुळे हि योजना बंद पडली.
मागील वर्षी तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही या भागातील शेतकऱ्यांना आपला हक्क मिळावा, यासाठी जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ असंवेदनशील आमदारांमुळे आली आहे.त्यामुळे तालुक्याच्या जनतेची सहनशीलता आता संपली, असल्याचे मत माजी आमदार अशोकराव काळे यांनी व्यक्त केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ बहादरपूर, रांजणगाव-देशमुख, काकडी आदी गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद त्यांनी साधला. ते पुढे म्हणाले, उजनी उपसा जलसिंचन योजना न परवडणारी असून 35 वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी हि योजना गुंडाळून ठेवत 11 गावातील जनतेला पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित ठेवले.2004 ला जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली.
त्यावेळी मी उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु केली. 2014 पर्यंत ही योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती. मात्र मागील पाच वर्षापासून तालुक्याच्या आमदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली आहे. या 11 गावातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिले आहे. मागील दोन महिन्यापासून कालवे सुरु आहेत.
आज जर हि योजना सुरु असती तर या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या व सिंचनाचा प्रश्न नक्कीच सुटला असता. परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसलेल्या तालुक्याच्या आमदारांनी या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली व या भागातील जनता पाण्यापासून वंचित राहिली याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
दुष्काळी परिस्थितीत तालुक्याच्या शेजारील सर्व तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला. मात्र कोपरगाव तालुका वगळला गेला. त्यावेळी आशुतोष काळे यांनी आमरण उपोषण केले. प्रशासनाकडून शासनाकडे वास्तव परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आश्वासन देवून आशुतोष काळे यांना उपोषण मागे घेण्यास सांगितले. परंतु शासनाकडून केवळ एकाच मंडलात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
त्यावेळी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ रांजणगाव देशमुख व परिसरातील गावातील नागरिकांनी स्वत:ची चिंता रचून त्या चितेवर बसून आंदोलन केले. तेव्हा या भागातील गावांमध्ये शासनाकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला, मात्र आजपर्यंत एकाही व्यक्तीला दुष्काळाच्या सवलतीचा लाभ मिळाला नाही. अशा प्रकारे सर्व सामान्य जनतेवर मागील पाच वर्षात सातत्याने अन्याय होत आला आहे. अशावेळी देशात व राज्यात ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे त्या तालुक्याच्या आमदार मात्र गप्प बसून राहिल्या. असे ते म्हणाले.