पाथर्डी – स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी मला मुलगी तर पंकजाताईंनी बहीण मानून समाजकारणात काम करण्याची संधी दिली. राजळे कुटुंब त्यांचे उपकार विसरू शकत नाही. त्यांनी दिलेल्या संधीच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे पोहोचण्याचा प्रयत्न केला.मतदारसंघात चांगले काम केले म्हणून पंकजाताईंनी माझ्यावर पुन्हा विश्वास टाकला. त्यांना ताकद देण्यासाठी सर्वांची साथ मला लागणार आहे.
पाच वर्ष मी तुमच्यासाठी दिले आता येणाऱ्या दहा दिवसातील प्रत्येक तास कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी द्यावा, असे आवाहन शेवगाव- पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांनी केले.
पाथर्डी शहराचे ग्रामदैवत खोलेश्वर मंदिराच्या प्रांगणात आ. राजळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला.
यावेळी राजळे बोलत होत्या. राजळे म्हणाल्या, मतदारसंघात विकास कामांबरोबरच लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. गेल्या पाच वर्षात विरोधकांवर सुद्धा आरोप केले नाहीत. राजकारणात विरोधकही असला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आपल्या कामात सुधारणा करता येते, अशी भूमिका ठेवली. विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना बोलायला जागा नाही. त्यामुळे मतदारसंघात दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. विकास कामे देताना शेवगाव, पाथर्डी असा दुजाभाव कधीही केला नाही.
पाथर्डीपेक्षा शेवगावला कणभर जास्त दिले तरीही दिशाभूल करणारा प्रचार सुरू आहे. जातीपातीचे राजकारण करून सुरू असलेले विष पेरण्याचे काम मतदारसंघासाठी घातक आहे. असे त्या म्हणाल्या. आदरणीय आप्पासाहेबांच्या अभिष्टचिंतनाच्या घरगुती कार्यक्रमाला व महाजनादेश यात्रेच्या कार्यक्रमाला पंकजाताई काही अडचणी असल्याने आल्या नाहीत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यात व माझ्यात मतभेद असल्याच्या विरोधकांनी अफवा पसरवल्या. कुठलीही नाराजी आमच्यात नाही.
स्वर्गीय राजाभाऊ गेल्यानंतर पंकजाताईंनी आधार दिला. धीर देण्यासाठी आलेल्या हजारो लोकांसाठी काम करायचे आहे, असे सांगून घराबाहेर काढलं. तेव्हापासून प्रत्येक क्षण लोकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. राजकारणात पुरुष मंडळी आडाखे बांधतात महिला भगिनीच्या मनामध्ये मात्र जिरवाजिरवीची भावना नसते. मी सुद्धा एक महिला आहे. माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे.
काम करताना कदाचित कुठे कमी पडले असेल मात्र कुणाविषयी आकस धरला नाही. कुणाला फसवणे नाही. कुठल्या गावात कमी-अधिक मतदान झाले म्हणून दुजाभाव केला नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून टीका करताना राजळे म्हणाल्या, निवडून आल्यानंतर जनतेला फसवले तर काय होतं हे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे.
निवडणूक प्रचारात भावनिक करण्याचा आरोप माझ्यावर केला जातो. कुणी म्हणेल माझी शेवटची निवडणूक आहे, खूप संघर्ष केला, मला न्याय द्या, मात्र अशा भावनिक आव्हानाला बळी पडू नका. निवडणुकीचे युद्ध हे युद्धाच्याच पद्धतीने लढायला पाहिजे गाफील राहू नका.त्यामुळे पुढच्या दहा दिवसातील प्रत्येक तास माझ्यासाठी द्या, असे आवाहन राजळे यांनी कार्यकर्त्यांना केले.