25 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीचा सहकारनगरला बसला होता मोठा फटका
सहकारनगर – पुण्यात काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसाने पुणेकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
काही दिवसांपूर्वी ढगफुटी मुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे सहकारनगर भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये अनेक घरे वाहून गेली तर अनेकांचे जीवसुद्धा गेले. सहकारनगर येथे सावरकर सोसायटीमध्ये भिंत पडून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला होता.
सावरकर सोसायटीमध्ये जागी काही जणांनी ओढ्यावर मातीचा केलेला भराव आणि नैसर्गिक प्रवाहात केलेला बदल यामुळेच पाण्याचा प्रवाहाला नैसर्गिक मार्ग न मिळाल्याने बंगल्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने वंदना अतितकर वय 55 या ज्येष्ठ महिलेचा अंगावर भिंत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे संबंधित अनधिकृतपणे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात अनधिकृतपणे बदल केलेल्या संबंधित व्यक्तींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांना केली आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी शासकीय अधिकारी यांना कळविले असून माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बराटे यांना माहिती देऊन पुढील कारवाई करण्यास शासकीय दरबारी पाठपुरावा करण्यास विनंती केली आहे. दोन दिवसांत पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच नाल्याचे नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावे, अशी मागणी केली आहे.
सावरकर सोसायटीलगत असलेल्या जागेत वनविभागाने भिंत बांधली असल्याने पावसाचे पाणी जाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबविल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाहाचे विभाजन न होता बंगल्यामध्ये पाणी आले आणि भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शासनाने योग्य ती कार्यवाही करून नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करावेत.
– प्रकाश बोकील, ज्येष्ठ नागरिक
सावरकर सोसायटीलगत काही इसमांनी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केल्याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सरकारी दरबारी पाठपुरावा करत आहे. सदर महिलेच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांचा पोलिसांनी योग्य तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पोलीस आयुक्त पुणे यांच्याकडे करणार असून न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाणार आहे.
– रवींद्र बराटे, माहिती अधिकार कार्यकर्ता