प्रशांत काटे : बॉयलर अग्नि प्रदीपन
भवानीनगर- श्री छत्रपती कारखान्यात यंदाच्या गळीत हंगामात सुमारे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी व्यक्त केले. श्री छत्रपती कारखान्याचा 64वा बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. एम. अनारसे व त्यांच्या पत्नी वैशाली अनारसे, कारखान्याचे कार्यलक्षी संचालक दत्तात्रय निंबाळकर व त्यांच्या पत्नी संगीता निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, बाळासाहेब पाटील, गणेशकुमार झगडे, राजेंद्र गावडे, नारायण कोळेकर, रसिक सरक, संतोष ढवाण, निवृत्ती सोनवणे, युवराज रणवरे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत काटे म्हणाले की, गाळप हंगामासाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात 12 हजार 200 एकर क्षेत्र उपलब्ध आहे.
यामधून तीन लाख 84 हजार टन ऊस उपलब्ध होईल. अकरा हजार एकर गेटकेन ऊसाचा करार झाला आहे. गेटकेनचा तीन लाख टन मिळून एकूण सहा लाख 84 हजार टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. गाळप हंगाम सुरू करण्याच्यादृष्टीने मशिनरी दुरुस्तीची व ओव्हर हॉलींगची कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. ऊस तोडणी व वाहतुकीच्या कामासाठी 450 ट्रॅक्टर एक हजार बैलगाडी 400 ट्रॅक्टर गाडी व चार हार्वेस्टरचे करार करण्यात आले आहेत. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत 10 हजार 655 एकर ऊस लागवडीची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 1500 एकर ऊस लागवड कमी झाली आहे. येत्या हंगामासाठी एफआरपी 2500 रुपये 80 पैसे इतकी आहे.