वन्यप्राण्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्याची गरज
पुणे – वन्यप्राणी वाचवा, वन्यप्राणी राहिले पाहिजे हा सूर आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो. मात्र, त्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत फारसे गांभीर्य दिसत नाही. त्यामुळेच राज्यात पशुवैद्यकीय उपचार केंद्रांची कमतरता भासत असून, आधुनिक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त उपचार केंद्रांची संख्या वाढविण्याबाबत प्राणीप्रेमींकडून मागणी होत आहे.
जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख म्हणाले, “आताच्या काळाचा जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यात वन्यप्राणी व त्या संबंधित प्रश्न आहेत. जसे की अमरावती व मेळघाट भागात अस्वल प्रश्न. कोल्हापूर व कर्नाटक लगत हत्ती प्रश्न. चंद्रपूर, गडचिरोली भागात वाघाचा प्रश्न तर संगमनेर, जुन्नर, नाशिक भागांत बिबट प्रश्न आहे. हे तर मोठे प्रश्न आहेत परंतु लहान पक्षी, तृणभक्षी प्राणी यांचा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाला आहे. त्याचा विचार केला तर त्याप्रमाणे खरचं आपल्याकडे उपचार केंद्र उपलब्ध आहेत का? याचे उत्तर कुठे तरी नाही असे येत आहे.
आज रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वन्यजीव उपचार केंद्र असायला पाहिजे, त्या उपचार केंद्रात चिमणीपासून ते हत्तीपर्यंत उपचार करण्याची सोय असायला पाहिजे.
पक्षी, तृणभक्षी, मांसाहारी, अशा सर्व प्राण्यांच्या रक्ताचे नमुने, लघवी नमुना, विष्टेचा नमुना निरीक्षणाची सोय त्याच उपचार केंद्रात असायला हवी. एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी आणि इतर आधुनिक बाबींचा समावेश या उपचार केंद्रात हवा, उपचार केंद्रात आवश्यक पशुवैद्यक, सहकारी आणि इतर कर्मचारी सुद्धा तत्पर असावेत. या सारख्या सुविधा प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन ठिकाणी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे’.
बोटावर मोजण्याइतकेच उपचार केंद्र
वाढता मानव-वन्यप्राणी संघर्ष, अपघात यासारख्या कारणांमुळे वन्यप्राण्यांच्या जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. जखमी अवस्थेतील प्राण्यांवर उपचार करण्यासाठी आवश्यक उपचार केंद्रांची संख्या केवळ बोटावर मोजण्याइतकीच आहे.
राज्याच्या प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या संकेस्थळावरील माहितीनुसार, राज्यात एकूण 13 ठिकाणी वन्यप्राणी उपचार केंद्र आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3, मुंबई-2, नागपुर-2, कोल्हापूर-2, औरंगाबाद, वर्धा, सोलापूर आणि गडचिरोली या ठिकाणी प्रत्येकी 1 उपचार केंद्र आहे. परंतु, जखमी प्राण्यांचे प्रमाण बघता, ही संख्या कमी असल्याचे प्राणीप्रेमींकडून सांगण्यात येते. इतकेच नव्हे, तर अनेक ठिकाणी प्राण्यांसाठी प्राथमिक उपचार केंद्रदेखील नसल्याची खंत प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.