नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा गोची झाली आहे. कारण ब्रिटनच्या एका न्यायालयाने भारताच्या बाजूने एक मोठा निर्णय देत पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे. 70 वर्षे जुन्या प्रकरणात 35 मिलिअन पौंड अर्थात 306.25 कोटी रुपयांच्या हैदराबादच्या निजामाच्या खजिन्यासंदर्भात न्यायालयाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे.
पाकिस्तानच्या दाव्यांना नाकारत याला परिस्थितीचा दुरुपयोग केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हैदराबादच्या निजामाचे वंशज आणि भारताचा या खजिन्यावर अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले. पाकिस्तानसरकार विरुद्ध निजामाचे शेवटचे वंशज मीर उस्मान अली खान, भारत सरकार आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यावतीने लंडनच्या न्यायालयात हा खटला सुरु होता.
हैदराबादच्या शेवटचा निजामाने सन 1948 मध्ये लंडनच्या नेटवेस्ट बॅंकेमध्ये 10 लाख पौंड त्यावेळचे तब्बल 8 कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. ही रक्कम आजच्या काळात 306.25 कोटी रुपये इतकी आहे. याप्रकरणी निजामाच्या वंशजांचे म्हणणे आहे की, 1948 मध्ये हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांच्या अर्थ मंत्रालयाचा कारभार सांभाळणारे मीर वनाज जंग यानी निजामाच्या परवानगीशिवाय लंडमध्ये पाकिस्तानच्या उच्चायुक्तांच्या बॅंक खात्यामध्ये 10 लाख पौंड जमा केले होते. यावरुन पाकिस्तानकडून आजवर या रकमेवर आपला अधिकार सांगण्यात येत होता.