बारामती बंदच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानियांची शरद पवारांवर टीका
मुंबई : राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह तब्बल 70 जणांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुन्हे दाखल केले आहेत. शरद पवारांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप पवार समर्थकांनी केला आहे. यामुळे आज बारामती बंदची हाक कार्यकर्त्यांनी दिली आहे. बारामती बंदवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. ‘बारामती बंद करणं’ हास्यास्पद असल्याचे दमानिया यांनी म्हटले आहे. तसेच बारामती कायमची बंद ठेवा काय फरक पडतो? असा सवाल केला आहे.
‘Baramati Bandh’ has been called by Sharad Pawar supporters?
This is ridiculous….
Chori toh chori, uppar se sina jori
Go keep your Baramati Bandh forever, who cares. This shows that you are now limited only to Baramati
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 24, 2019
अंजली दमानिया यांनी ट्विट केले की, शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदचे आवाहन केले आहे. ‘चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी’ असं सांगत बारामती कायमची बंद ठेवा, कुणाला फरक पडतोय? उलट यामुळे तुम्ही बारामतीपुरतेच मर्यादित आहात, हे सिद्ध होते, अशा शब्दांत दमानियांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. यापूर्वीदेखील राज ठाकरेंना ईडी चौकशीसाठी बोलवल्यावर दमानियांनी टीका केली होती. कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते. चौकशीसाठी गेलेल्या राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा होते. त्यावरून अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? असा सवाल दमानिया यांनी केला होता.