गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांनी 1923 मध्ये केले होते उद्घाटन
– तुषार रंधवे
पुणे – शहराच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान असलेल्या शिवाजी पुलाला दि.17 सप्टेंबर रोजी 96 वर्षे पूर्ण होत आहेत. आता हा पूल शंभरीकडे यशस्वी वाटचाल करत आहे. अलीकडच्या काळात बांधलेली धरणे व अनेक पुलांच्या बांधकामांच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. यात गेल्या 96 वर्षांपासून ऊन, वारा व पावसाचा मारा सहन करत मुठा नदीवरील हा पूल मोठ्या दिमाखात व सुस्थितीत आहे. सन 1920 मध्ये जानेवारी महिन्यात या पुलाचे काम सुरू करण्यात येऊन 17 सप्टेंबर 1923 रोजी मुंबई प्रांताचे गव्हर्नर जॉर्ज लॉईड यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. ही माहिती देणाऱ्या संगमरवरी शिला आजही पुलाच्या मध्यभागी पाहावयास मिळतात. या पुलाचा नकाशा काढणारे, इतर जबाबदार अधिकारी यांच्या बरोबरीने गणपतराव महादेव केंजळे यांचेही नाव या ठिकाणी कोरलेले आहे. केंजळे हे त्या काळातले प्रख्यात ठेकेदार होते. त्यांनीच या पुलाचे बांधकाम केले आहे.
1920 पूर्वी लकडी पूल व कसब्यातील कुंभारवाड्याजवळचा धरणवजा पूल ही दोनच माध्यमे नदी ओलांडण्यासाठी 12 महिने वापरात येण्याजोगी होती. या पुलावरून आजही दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. महापालिकेने काही वर्षांपूर्वी पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. याशिवाय शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर या पुलाच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी जुन्या काळातील दिव्यांचा साज चढविला होता. मात्र, हे दिवे चोरीस गेले असून आता केवळ एक-दोन दिवे दिसतात. येत्या चार वर्षांत हा पूल आपल्या वयाची शंभरी पार करत आहे.
अशी आहे शिवाजी पुलाची रचना
शिवाजी पुलास लॉईड ब्रिज किंवा नवा पूल नावानेही ओळखले जाते. पुलास मध्यभागी महिरप आणि एकूण आठ कमानी आहेत. महिरपीप्रमाणे आणखी एक महिरप शेखसल्ला दर्ग्यापाशी असून ती बुजविली आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेला हा पूल आजही सुस्थितीत आहे, हे विशेष. शिवाय त्याचे बांधकाम कलात्मक असून पुण्यातील इतर पूल याच्यापुढे सिमेंटचे ठोकळे वाटावेत, असे आहेत.