कोपर्डेहवेली – शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्यांची निर्मिती झाली. त्यातून समाजाची नाळ बांधली गेली. काही लोक सहकारातून पुढे आले आणि लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत गेला. परंतु गेल्या काही वर्षांपासून आमदार, खासदार होण्यासाठीच खासगी कारखाने उभे केले जात आहेत. समाजाच्या हितासाठी सहकार वाचला पाहिजे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोपर्डे हवेली, ता. कराड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, समाज कल्याणचे सभापती शिवाजीराव सर्वगौड, कराड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, उपसभापती सुहास बोराटे, जि. प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, युवा नेते जशराज पाटील, सागर पाटील, शंकरराव चव्हाण, संजय जगदाळे, बळवंतराव चव्हाण, सौ. मेघनाताई चव्हाण, मारुती बुधे, सरपंच मेघा होवाळ, उपसरपंच लक्ष्मण चव्हाण उपस्थित होते. आ. पाटील म्हणाले, गावाला काम आणि शेतीमालाला दाम असे आमचे काम करण्याचे सुत्र आहे. निव्वळ भावनेवर राजकारण करण्याची भाजप सरकारची प्रवृत्ती आहे. जनतेला फसवून मते मागू नका.
सुनील माने म्हणाले, हुकूमशाही देशांची लोकशाहीकडे वाटचाल सुरू असताना आपला देश मात्र लोकशाहीतून हुकूमशाहीकडे चाललाय. हे सरकार अण्णाजी पंतांचे सरकार आहे ते कधीच सुधारणार नाही. छत्रपतींचे किल्ले विकण्याचे काम या सरकारने केले आहे. यावेळी शिवाजीराव सर्वगौड, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, सुहास बोराटे, सिध्दार्थ चव्हाण, विजय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक बळवंतराव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी चव्हाण यांनी केले. आभार पृथ्वीराज चव्हाण यांनी मानले.