पुणे – कांद्याच्या भावात घाऊक बाजारात मागील तीन दिवसांत किलोमागे 2 ते 3 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचे डोळे पाणावले आहेत. तर, दुसरीकडे भाववाढ झाल्याने बळीराजा सुखावला आहे. मार्केटयार्डात प्रतिदहा किलो कांद्यास 280 ते 320 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ आणि रितेश पोमण यांनी दिली. किरकोळ बाजारात 40 ते 60 रुपये भावाने विक्री होत आहे.
राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच ठिकाणी कांदा भिजलेला आहे. तसेच नवीन कांद्याची लागवड देखील धोक्यात आली असून सद्यस्थितीत जुन्या कांद्याचा कमी प्रमाणात शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होत आहे. सलग दोन सुट्यानंतर मार्केट यार्डात रविवारी 125 ट्रक आवक झाली. दररोज सरासरी 50 ते 60 ट्रक इतकी आवक होत आहे. जुना कांदा वखारीत ठेवून जवळपास सहा महिने झाले असल्यामुळे सद्यस्थितीत खराब कांद्याचे प्रमाण वाढलेले आहे. उच्च प्रतिच्या कांद्याची आवक कमी होत असून उच्च प्रतीच्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढली आहे. श्रीगोंदा, नगर, आष्टी परिसरात मोठा पाऊस न झाल्यामुळे पावसाअभावी नवीन कांद्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे भुजबळ, पोमण यांनी सांगितले.