सुपे मार्केट कमिटी व आठवडे बाजारात दुष्काळाचा परिणाम
काऱ्हाटी – बारामती तालुक्यामधील जिरायती भागात गेल्या चार वर्षांपासून पावसाचे अत्यल्पप्रमाण असल्याने या परिसरातील गावांमध्ये तीव्र दुष्काळ आहे. त्याचाच फटका बाजाराला बसला असून बुधवार (दि. 4) सुपे येथील मार्केट कमिटी व आठवडे बाजारात शुकशुकाट होता त्यामुळे कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढाल थेट हजारांवर आल्याने हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे.
बारामतीच्या जिरायती भागात यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे या परिसरपिकांची परिस्थिती गंभीर झाली आहे. कमी पावसामुळे बाजरी, तूर, मका याचे उत्पादन निघेल की नाही अशी शंका निर्माण झाल्याने सुपेतील उपबाजार समितीमधील शेतमालाची आवकही घटत चालली आहे. त्यामुळे बाजार समितीवर अवलंबून असलेले हमाल, मापारी, अडते, व्यापाऱ्यांच्या कामकाजावरसुद्धा थोडाबहुत परिणाम जाणवत आहे.
बारामती तालुक्यातील उपबाजार म्हणून एक वेगळी ओळख असणारे सुपे कृषी उत्पन्न बाजार समिती जिरायती भागातील 42 गावांचे चालणारी आवक-जावक धान्य, पालेभाज्या, औषधे, बी-बियाणे आणि इलक्ट्रिकल्स वस्तूंची दर बुधवारी असणारी उलाढालही 25 टक्क्यांवर आल्याची माहिती विविध क्षेत्रातील दुकानदार, आडतदार पांडुरंग चांदगुडे यांनी दिली. दरम्यान, गेल्या चार ते पाच वर्षांपासून नापिकी आहे. काही भागांमध्ये तीव्र दुष्काळ जाणवत आहे. पीक परिस्थिती समाधानकारक नाही. भाव-कमी जास्त होत असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून तो शेत जमिनी कसायला तयार नाही तर नापिकीमुळे कोणी जमिनी विकत घेण्यास तयार नसल्याने येथील शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे.
सर्वाधिक शेतकरी हे कोरडवाहूच शेती करतात. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र उत्पादन चांगले झाले; परंतु कोरडवाहू शेतीला यंदा पावसाने दगा दिल्यामुळे उत्पादनावर त्याचा निश्चित परिणाम झाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या.
बाजरी, तूर, मका आदी पिके सुपे परिसरात मोठ्या प्रमाणात घेतली जातात; परंतु या पिकांवर रोगराईचे मोठे प्रमाण आढळून येत आहे. त्यातच पावसानेही साथ न दिल्याने औषधी खरेदीसाठी शेतकरी येत नाही.
– दिनेश दुर्गे, कृषी सेवा केंद्र
पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले व सलग दोन वर्षे पाऊसच नाही, त्यामुळे धान्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
– अविनाश काळखैरे, शेतकरी