पुणे – निर्माल्य दान आणि त्यावर प्रक्रिया करण्याविषयीही एवढी जागृती केली जात असतानाही नागरिकांनी नदी पुलांवर निर्माल्य टाकण्याचा प्रकार गेल्या महिनाभरापासून वाढला आहे. श्रावणात ज्या पूजा केल्या जातात; त्याचे निर्माल्य या पुलांवर आणून टाकले जात असल्याने येथे अक्षरश: निर्माल्याचा ढीग तयार झाला आहे.
हाच प्रकार गणेशोत्सवाच्या काळात होऊ नये, यासाठी महापालिकेने 38 निर्माल्यकलश नदीकाठी ठेवले आहेत. याशिवाय घाटांवर निर्माल्य गोळा करण्यासाठी कंटेनरही सज्ज केले असून, ठिकठिकाणी 40 कंटेनरही ठेवण्यात आले आहेत.
अनेकदा निर्माल्य थेट नदीत टाकले जाते. मात्र, या निर्माल्यावर प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. हे निर्माल्य प्लॅस्टिक पिशव्यांमधून न टाकता थेट टाकल्यास त्याचा उपयोग चांगला करता येऊ शकतो. तसेच निर्माल्यामध्ये असणाऱ्या बेल, केळीची पाने, विविध प्रकारची फुले यांमुळे खतनिर्मितीही उत्तम दर्जाची करता येऊ शकते. याशिवाय फुलांपासून नैसर्गिक रंगही बनवले जाऊ शकतात.
परंतु अंधश्रद्धेपोटी अनेकजण हे निर्माल्य थेट नदीमध्ये टाकतात. एवढेच नव्हे, तर प्लॅस्टिक कॅरीबॅगसह ती नदीत टाकली जाते यामुळे नदीचे, पाण्याचे प्रदूषण होते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव करताना केवळ सजावटीच्या भागाचाही उपयोग करून चालणार नाही. तसेच शहर स्वच्छतेमध्येही कचऱ्याबाबत सजगपणे विचार करणे आवश्यक असून, त्याचा एक भाग निर्माल्यही आहे, याची जाणीव ठेवणेही गरजेचे आहे.