काश्मीर प्रश्नी इम्रान खान पुन्हा बरळला
इस्लामाबाद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर मुद्द्यावरून सोमवारी आपल्या राष्ट्रांला संबोधून भाषण केले. इम्रान खान यांनी म्हटले की, कलम 370 हटविल्याची मोठी चूक मोदी यांनी केली आहे. यामुळे काश्मीरच्या लोकांना स्वतंत्र होण्याची संधी मिळाली आहे. हा मुद्दा आम्ही जगासमोर मांडणार आहोत. हा मुद्दा आता जगासमोर आला आहे. आता मी काश्मीरचा मुद्दा जगभरात उठविणार आहे. मी सर्वांना सांगणार आहे, की काश्मीरात काय होत आहे. मी काश्मीरचा राजदूत बनणार आहे. तसेच भारताने ज्या प्रकारे त्यांनी बालाकोटमध्ये केला तसा प्रयत्न त्याचा पीओकेमध्ये करण्याचा होता. पीओकेमध्ये आम्ही पूर्णपणे तयार आहोत.
इम्रान खान म्हणाले, आम्ही काश्मीरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात यशस्वी झालो आहोत. आम्ही जगातील नेत्यांशी आणि दूतावासांशी या संदर्भात बातचित केलेली आहे. 1965 नंतर पहिल्यांदा संयुक्त राष्ट्राने काश्मीर मुद्द्यावर बैठक बोलावली. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय मीडियानेही या मुद्द्याला उचलून धरले आहे. मी 27 सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत बोलणार आहे. जगाच्या व्यासपीठावर काश्मीराचा मुद्दा उपस्थित करणार आहे.
त्यांनी सांगितले की, काश्मीर मुद्द्यावर निर्णायक कारवाई करण्याची वेळ आता आली आहे. आता पाकिस्तानचे लोक आणि सरकारला काश्मीरी जनतेसोबत उभे राहिले पाहिजे. आम्ही काश्मीरासाठी दर आठवड्याला एक कार्यक्रम करणार आहोत. या सोमवारीही प्रत्येक पाकिस्तानी नागरिकांना 12 ते 12.30 या कालावधीत जिथे असाल त्या ठिकाणावर एकत्र येऊन काश्मीरी जनतेसाठी उभे राहिले पाहिजे. हा काश्मीरला स्वातंत्र्य मिळण्याचा काळ आहे.
आण्विक हल्ल्याची पुन्हा दिली धमकी
काश्मीरसाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्यास पाकिस्तान तयार आहे. दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहेत, त्याचा वापर केल्यास जगात हाहाकार माजेल, असे म्हणत इम्रान खान यांनी अप्रत्यक्षरीत्या भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, आता बालाकोटसारखे हल्ले भारत पुन्हा करू शकणार नाही. जोपर्यंत काश्मीर स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत काश्मीरचा मुद्दा आम्ही लावून धरू, असेही इम्रान खान यांनी सांगितलं आहे.