नवी दिल्ली : काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी नवनवीन कृप्ल्या पाककडून केल्या जात आहेत. त्यातच आता काश्मीरच्या शांततेचा भंग करून वातावरण कलुषित करण्यासाठी अफगाणिस्तानातील 100 कट्टर दहशतवादी काश्मीरमध्ये आणण्याची योजना पाकिस्तान आखत असल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये वाढ होताना दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदचे सुमारे 15 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानमधील लिपा खोऱ्यातील दहशतवादी तळांवर आधीच वाट पाहात आहेत, असे गुप्तचर यंत्रणाच्या अहवालांच्या हवाल्याने या सूत्रांनी सांगितले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील दहशतवादी गट येत्या काही आठवडयांत भारतातील अनेक प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करू शकतात. भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती झपाटयाने ढासळत असल्याचे चित्र आंतरराष्ट्रीय समुदायापुढे उभे करण्यासाठी दहशतवादी हल्ल्यांची मालिका घडवून आणण्याची पाकिस्तानची योजना आहे.