महाजनादेश यात्रेच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा
राहुरी – विधानसभा निवडणुकीत आमदार शिवाजी कर्डिले हेच उमेदवार राहणार असून तेच सर्वाधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केला. राहुरी येथे 25 ऑगस्टला होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रा व जाहीर सभेच्या नियोजनाबाबत बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार शिवाजी कर्डिले होते.
यावेळी बोलताना खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण गरम होते, म्हणून राहुरीचा सत्कार घेता आला नाही. पण आता वातावरण निवळले आहे. खासदार म्हणून आपली जबाबदारी पार पाडणार आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री कधी लाभला नाही. राहुरी तालुक्यासाठी मुळा धरणातून यावर्षी चार आवर्तन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संसदेत अनेक महत्वाचे निर्णय झाले.
जनतेचे पुढील पाच वर्षात निराधार योजना, शिधापत्रिका आदी प्रश्न सोडविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आ. शिवाजी कर्डिले म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांची राहुरी येथील महाजनादेश यात्रा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी. 20 वर्षात मिळाला नाही इतका निधी 5 वर्षात मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे भव्य स्वागत मतदार संघातील जनतेने करावे. लोकसभा निवडणुकीत राहुरी तालुक्याने जास्त मताधिक्य दिले असे आ. कर्डिले यांनी सांगितले.
यावेळी विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, उत्तमराव म्हसे, आसाराम ढुस, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रम तांबे, दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, बाळकृष्ण बानकर, कारखाना संचालक नामदेव ढोकणे, रविंद्र म्हसे, उत्तम आढाव, विजय डौले, न.पा. विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, संदिप गाडे, नानासाहेब गागरे, शिवाजी सागर, भाऊसाहेब गाडे, संभाजी पवार, नगर बाजार समितीचे संचालक रेवन्नाथ चोभे, संदीप कर्डिले, संतोष म्हस्के, बाबासाहेब खरसे, विजय बानकर, अमोल भनगडे, बबन कोळसे, आण्णासाहेब बलमे, सीताराम ढोकणे, संदीप गिते, विजय कानडे, राजेंद्र उंडे, प्रभाकर हरिश्चंद्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.