शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक
शिरूर -वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकरी, नागरिकांना कुठली अडचण होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये वीज वितरणाची कामे प्रलंबित आहे ती कामे लवकर पूर्ण करण्यात येतील, तशा सूचना अधिकारी वर्गाला दिल्या आहेत.
शिरूर तहसील कार्यालय सभागृहामध्ये वीज वितरण कंपनी अधिकारी व शेतकरी, नागरिक यांच्या वीज वितरणबाबत तक्रारी व त्यांच्या समस्या व त्यावर लगेच तोडगा निघावा यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती विश्वास कोहकडे, भाजप शहराध्यक्ष केशव लोखंडे, सुरेश थोरात, दादा पाटील घावटे, पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, राजेश लांडे, वीज वितरण कंपनीचे बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र येडगे, उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड, नीतिन महाजन, सहायक अभियंता भगवान इधाते, दीपक पाचुंदकर, बाळासाहेब टेंगले, मतीन मुलांनी व शेतकरी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी शेतकरी व नागरिकांनी वीजेचे जास्तीचे वीजबिल, अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र मिळत नसल्याचे सांगितले. अनेक गावांमध्ये शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहक तारा कमी उंचीवर आहेत. नवीन रोहित्राची मागणी, अपूर्ण कामे, स्ट्रीट लाईटची कामे व्हावीत यासाठी मागणी करण्यात आली. काही ठिकाणी उपकेंद्राची मागणी केली. अनेक गावांमध्ये वायरमनची संख्या कमी असल्याचे सांगून काही गावांमध्ये सहायक अभियंता पद मिळावे अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी याबाबत निर्णय किती दिवसात होईल हे स्पष्ट केले. जिल्हा पातळीवर, मंत्रालय पातळीवरची कामे प्राधान्याने करून देण्यात येतील.