धनगर समाजाने पाठवली नोटीस
बारामती – शहरातील हरिकृपा नगर येथे असलेल्या अहिल्यादेवी होळकर उद्यानावर बुलडोझर फिरवत त्याठिकाणी पाण्याच्या टाकीचे बेकायदेशीर बांधकाम नगरपरिषदेने सुरू केले आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या या कृत्यामुळे बारामती शहर व तालुक्यातील धनगर समाज संतप्त झाला आहे. पाण्याची टाकी बांधायची होती तर 30 लाख रुपये खर्चून उद्यान विकसित करण्याची गरज काय होती? असा सवालही उपस्थित करीत मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांना 60 लाख रुपये वसुलीची नोटीस देखील काढण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या अजब कारभारामुळे नगरसेवक-नगरसेविका हादरले आहेत आहेत. पाण्याच्या टाकीचा बेकायदेशीर ठराव करणारे झारीतील शुक्राचार्य कोण? याची चर्चा शहरात सुरू आहे.
अहिल्यादेवी होळकर उद्यान पाण्याची टाकी बांधण्याचा पहिला ठराव असताना उद्यान विकसित करण्याचा ठराव का करण्यात आला उद्यान विकसित झाल्यानंतर पुन्हा पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु कसे झाले हा काय प्रकार आहे हा प्रश्न जनतेला पडला आहे. जर पाण्याची टाकी बांधायची होती तर उद्यान विकासासाठी जनतेचे 29 लाख रुपये खर्च का केले असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. नगरपालिकेतील कोणत्या तज्ज्ञांच्या सांगण्यावरून जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. याची दखल घेणे गरजेचे आहे. बारामतीचे नागरिक निलेश धालपे, संपत टकले व आरटीआय कार्यकर्ते पोपट धवडे यांनी माहिती अधिकारात याप्रकरणाची पोल-खोल करीत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परी पत्रकाप्रमाणे नागरीवस्ती जवळ घराजवळ हॉस्पिटल जवळ व उद्यानामध्ये कोणतेही उंच पाण्याचासाठा करणारी टाकी बांधता येणार नाही असे असताना देखील अहिल्यादेवी होळकर उद्यानात पाण्याची टाकी बांधण्याचा घाट का घातला जात आहे. त्याच परिसरात पर्यायी जागा उपलब्ध असताना देखील उद्यानात पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. यापाठीमागे नक्कीच काहीतरी गौड बंगाल असल्याचा वास येत आहे. जनहिताचा विरोधात होत असलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकामाला स्थगिती मिळावी अशी मागणी तसेच बेकायदेशीर कामाची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे निलेश घालते व संपत टकले यांनी केले आहे. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नगरपरिषद चालवतो तरी कोण?
शहरातील अहिल्यादेवी होळकर उद्यान विकास व गांधी चौकातील डॉक्टर बाचल रस्तारुंदीप्रकरणी 60 लाख रुपये वसुलीची नोटीस आल्याने नगरसेवक-नगरसेविकांची घाबरगुंडी झाले आहे. याप्रकरणी आम्हाला कशाचाही थांगपत्ता नसल्याचे त्यांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. तर या प्रकरणापासून दोन हात लांब असल्याचे सांगत नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, शहरातील कामांबाबत जर नगरसेवकांनाच माहित नसेल तर नगरसेवक नेमके करतात तरी काय? अन् नगरपरिषद चालवतो तरी कोण? असा सवाल आता उपस्थित झाल आहे.
रोष बारामतीच्या नेतृत्वाला परवडणारा नाही
बारामती शहरातील अहिल्यादेवी होळकर उद्यान हा शहरातील जनतेच्या तसेच धनगर समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे असतानादेखील या उद्यान वरती बुलडोजर फिरवण्यात आला त्यामुळे या समाजातील जनतेच्या भावना दुखावले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल काही दिवसांतच वाजणार असून तालुक्यातील धनगर समाजातील जनतेचा रोष बारामतीच्या नेतृत्वाला परवडणारा नसेल. अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत आमदार अजित पवार काय भूमिका घेणार याकडे देखील लक्ष लागले आहे.