संकटकाळात कोणीही राजकारण करू नये : कोल्हे
कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील आपत्तीग्रस्तांसाठी 1 कोटी 8 लाख रुपयाची तातडीच्या मदतीची तजवीज करण्यात आली आहे. संकटकाळी कोणीही राजकारण करू नये, असे आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या.
कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या दिवशी आ. स्नेहलता कोल्हे, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते तालुक्यातील पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आ.कोल्हे बोलत होत्या. पुढे म्हणाल्या, पूर येण्यापूर्वी योग्य पद्धतीने नियोजन केल्यामुळे आलेले मोठे संकट टळले. कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून त्यांच्या संसार उपयोगी वस्तूचे नुकसान झाले. आपत्तीग्रस्तांना तातडीच्या मदतीची व्यवस्था केली. मदत म्हणून पूर्वी 5 हजार रुपये मिळत होते त्यात वाढ करून शासनाने शहरी भागासाठी 15 हजार रुपये व ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये वाढीव मदत दिली आहे. नागरीक पुराच्या संकटातून वाचले पण शहराला रोगराईच्या संकटातून वाचण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्न केले पाहिजे.
तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले, तालुक्यातील 2 हजार 371 कुटुंब पुराच्या पाण्याने बाधित झाले. 350 दुकाने, 44 घरांची पडझड झाली यामध्ये 3 जनावरे मयत झाली. प्रति कुटुंबाला 5 हजार रुपये व नव्याने वाढीव झालेले अनुदान मिळणार आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, पराग संधान, नगरसेवक रवींद्र पाठक, स्वप्निल निखाडे , जनार्दन कदम, अरिफ कुरेशी, नगरसेविका ताराबाई जपे, भारती वायखिंडे, माजी नगरसेवक बबलू वाणी उपस्थित होते.